Join us  

मुंबई काँग्रेसमध्ये पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन

By रेश्मा शिवडेकर | Published: January 15, 2024 6:02 PM

काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी संध्याकाळीच देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश काढले. 

देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि अॅड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह २३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या २३ जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल गायकवाड यांनी रविवारी रात्री त्यांचे निलंबन केले.मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात गर्दी

सोमवारी सकाळी ३०० पेक्षा जास्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी करत दक्षिण मुंबई अजूनही काँग्रेससोबतच असल्याची ग्वाही दिली. यात आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित, पालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दीकी, पूरन दोशी आदी नेत्यांचा समावेश होता.गायकवाड यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कार्यकर्त्यांशी एक-एक करून दिवसभर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सर्व कार्यकर्त्यांना पक्षाकडून हवं ते पाठबळ मिळेल, अशी ग्वाही दिली.‘ते लोक होते वेगळे...

पक्ष आणि विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारे लोक यशस्वी होतात. दुर्दैवाने मिलिंदजींनी पक्षाशी आणि विचारधारेशीही फारकत घेतली. पण एक व्यक्ती सोडून गेल्याने ना पक्ष खिळखिळा होत ना विचारधारा कमकुवत होत! उलट त्यामुळे मला आणि असंख्य कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळालं आहे. सुरेश भटांचा एक शेर या वेळी मला आठवतोय, ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे... मी वाट थांबून पाहतो, मागे किती जण राहिले?’ हे मागे राहिलेले लोक सच्चे काँग्रेसी आहेत आणि तेच आम्हाला विजयपथावर घेऊन जातील.– प्रा. वर्षा गायकवाड. अध्यक्षा, मुंबई काँग्रेस