२७ गावांवर टांगती तलवार कायम
By admin | Published: October 8, 2015 12:28 AM2015-10-08T00:28:45+5:302015-10-08T00:28:45+5:30
२७ गावे वगळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी बुधवारी बेंच उठल्याने येत्या १४ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
- अरविंद म्हात्रे, चिकणघर
२७ गावे वगळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी बुधवारी बेंच उठल्याने येत्या १४ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. यामुळे २७ गावांवरील टांगती तलवार निर्णय येईपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
बुधवारी २७ गावांबाबतच्या याचिकेच्या सुनावणीचा नंबर १७ वा होता. तत्पूर्वी पहिल्या सत्रात १ ते १३ सुनावण्या झाल्या. मात्र, १४ व्या सुनावणीत पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणामुळे बराच वेळ निघून गेला. त्यामुळे पुढील सुनावणी १४ आॅक्टोबरला घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, शासनाने या प्रकरणी वकील बदलला असून पुढील तारखेपासून नागपूरच्या अॅड. अणे यांना पाचारण केल्याची माहिती लोकमतला मिळाली असून निवडणूक आयोगाची काहीही भूमिका असली तरी शासनाने २७ गावांची नगरपालिका बनविण्याची तयारी सुरू केल्याची खात्रीलायक माहितीही मिळाली आहे. येत्या १४ आॅक्टोबरला नक्कीच निर्णय होईल, असा विश्वास २७ गावे संरक्षण हक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
न्यायालयीन निकालाला उशीर झाला तरी निवडणुकी पूर्वी २७ गावांच्या मनपा समावेशाला स्थगिती मात्र नक्कीच मिळेल.
- चंद्रकांत पाटील, याचिकाकर्ता तथा सरचिटणीस २७ गावे संरक्षण हक्क समिती, कल्याण