जव्हार : लोकसभा निवडणुकीत व आचारसंहिता काळात सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने कामाला लावले खरे त्या काळात अनेक विकासकामे, ग्रामस्थांची कामे ठप्प झाली होती. २३ मे रोजी आचारसंहिता संपल्यावर आता तरी आपली कामे होतील अशी आशा जव्हार तालुक्यातील आदिवासी नागरिकांना होती. मात्र त्या नंतर सुद्धा आजपर्यंत तलाठी कार्यालयाला कुलूपच आहे. याबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता महसूल विभागातील अनेक कर्मचारी, तलाठी हे गावालाच असल्याचे उत्तर मिळते.तालुक्यातील दुर्गम भागातून येथील ग्रामस्थ सातबारा, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले, रेशनकार्ड या महत्त्वाच्या महसुली कामासाठी गेल्या दीड महिन्यापासून तलाठी कार्यालयात रोजगार बुडवून, पदरमोड करून चकरा मारून हैराण झाला आहे. परंतु याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे सर्व दफ्तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे उत्तर तहसील कार्यालयातून मिळते. १२ वीचा व दि. १७ जून रोजी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न, रहिवासी, जातीच्या दाखल्यासाठी आवश्यकता असते. ते नसले तर त्यांना प्रवेशासाठी अडचणी निर्माण होवून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहेच. त्यामुळे याची महसुल विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)
तलाठी कार्यालय बंद
By admin | Published: June 18, 2014 11:45 PM