Join us  

मेट्रो-२ ब,मेट्रो-४ साठी मागवल्या निविदा

By admin | Published: January 05, 2017 5:59 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा तर्फे दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर मेट्रो-२ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ या मार्गाची अंमलबजावणी हाती घेण्यात आली

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा तर्फे दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर मेट्रो-२ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ या मार्गाची अंमलबजावणी हाती घेण्यात आली असतानाच आता डी.एन. नगर ते मानखुर्द मेट्रो-२ ब आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ मार्ग व मार्गावरील स्थानके बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.मेट्रो-२ ब मार्गाच्या कामासाठी १० हजार ९८६ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गाचे काम पाच टप्प्यात विभागण्यात आले आहे. एसिक नगर ते खिरा नगर, सारस्वत नगर ते बीकेसीमधील आय.एल.एफ.एस, एमटीएनएल मेट्रो ते चेंबूर, डायमंड गार्डन ते मंडाळे (डेपो) शिवाय मध्य रेल्वेच्या पूर्व आणि लोकमान्य टिळक टर्मिन्स येथे रेल्वे ओलांडणी पूल बांधण्याच्या कामासाठी या निविदा मागवण्यात आल्या आहेत.मेट्रो-४ च्या कामासाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गाचे काम पाच टप्प्यात विभागण्यात आले आहे. वडाळा ते अमर महल जंक्शन, गरोडिया नगर ते सुर्या नगर, गांधी नगर ते सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र ते माजिवडा आणि कापूरबावडी ते कासारवडवली दरम्यानचा उन्नत मार्गासह स्थानके बांधण्यासाठी या निविदा मागण्यात आल्या आहेत. निविदा पूर्व बैठक ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित के ली आहे. विकासकामांना विरोध नाहीच; मात्र पर्यावरणाची हानी होता कामा नयेमुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाबाबत वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन डी यांनी मत नोंदवताना सांगितले की, आमचा विकास कामांना विरोध नाही. मात्र मेट्रोचे प्रकल्प राबवताना पर्यावरणाची हानी होणार नाही; याची काळजी घेणे गरजेचे आहे. आता मेट्रो-३ चे काम सुरु असून, खोदकाम करताना उडणारी धूळ खाली बसण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या जात नाहीत. जेथे काम सुरु आहे; तेथे धूळ उडत असेल तर संबंधित ठिकाणी पाणी मारण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो-३ च्या कामादरम्यान ५.४ मिलियन टन माती निघणार आहे. आणि आता कामादरम्यान निघणारी माती आरे कॉलनीमध्ये टाकली जात आहे. परिणामी असे काम होत असेल तर पर्यावरणाची हानीच होईल. दुसरे असे की, ही कामे करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला काहीच कल्पना देण्यात आलेली नाही. या कारणात्सव मंडळाकडे याबाबतचे एक निवेदन सादर करण्यात आले आहे.