Join us

“आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, पण आता मुंबईला वाली राहिला नाही”; अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 1:42 PM

Thackeray Group Ambadas Danve News: पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले असून, अनेक ठिकाणी तुंबई झाल्याचे चित्र आहे. यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली.

Thackeray Group Ambadas Danve News: मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले आहे. मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचे चित्र आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष देत होते, परंतु, आता मुंबईला कुणी वाली राहिलेला नाही, असे सांगत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. 

मुंबईतील पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. चाकरमान्यांना अडचणींचा सामना करत ऑफिस गाठावे लागले. इतकेच नाही, तर एक्स्प्रेसचा खोळंबा झाल्याने अनिल पाटील आणि अमोल मिटकरी या आमदारांना रुळांवरून पायपीट करत पुढील रस्ता गाठावा लागला. पावसामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून, सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच विधिमंडळ अधिवेशन सुरू असून, विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, पण आता मुंबईला वाली राहिला नाही

मुंबईत पाऊस येणे हे अचानक झालेले नाही. यावरून पावसाळ्यापूर्वी काम झालेले नाही हे सिद्ध होत आहे. आदित्य ठाकरे जोपर्यंत होते, तोपर्यंत मुंबईत बारकाईने लक्ष देत होते. मात्र आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. 

दरम्यान, वरळीतील हिट अँड रन केसवरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. वरळीत शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने आपल्या भरधाव महागड्या कारने हिलेला चिरडले आणि तिथून फरार झाला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा हा मद्यपान करून महिलेला घडक देतो, फरफटत नेतो. सर्वसामान्य माणसाचा जीव कसा घेता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्री भल्याभल्यांची विकेट घेतात, मात्र एवढी यंत्रणा असून आरोपीला पकडू शकले नाहीत, या शब्दांत अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :अंबादास दानवेआदित्य ठाकरेआदित्य ठाकरेशिवसेनामुंबई मान्सून अपडेट