Join us  

“अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न, ही शिंदे गटाची भूमिका”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:27 AM

Sanjay Raut News: महायुतीत संघर्ष असून, तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut News:महायुतीत संघर्षाची स्थिती असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच रामदास कदम, रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्यातही आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. महायुतीत आलबेल नसल्याचे विरोधकांकडून बोलले जात असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीतील बेबनावावर भाष्य केले. महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे. नाहीतर यांच्या गटाला जागा कमी येणार आहेत. महायुती हा शब्द गोंडस आहे ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहेत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे आपण पाहू शकतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे

मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे. ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे. पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम खात, नगर विकास खात या शिंदे गटाच्या एटीएम मशीन बनलेल्या आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच सरकार हे पैशाच्या मागे लागलेले आहे. हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्या मारामाऱ्या होतील. एकमेकांच्या जागा पाडल्या जातील. जागावाटपावरुन खून खराबा होऊ एवढीच आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवविला जात आहे. यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये निवडणूक होणार असेल, तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. आता निवडणूक घेतली, तर आपला पराभव होईल, अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे, त्यामुळेच त्यांनी हा डाव टाकला आहे. लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आहे. निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे. ही संस्था पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असेल, तर या देशात लोकशाही कुठे आहे, अशी विचारणा संजय राऊतांनी केली होती. 

टॅग्स :संजय राऊतमहायुतीशिवसेना