Join us  

“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 3:55 PM

Thackeray Group MP Sanjay Raut News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन संविधान संपवले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Thackeray Group MP Sanjay Raut News: विरोधकांना संपवण्याची भाषा आपल्या देशात होत आहे. काहीजण राहुल गांधींची अवस्था त्यांचे वडील आणि आजी यांच्यासारखी होईल असे म्हणत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री यावर शांत बसत असतील तर ही एक रणनीती आहे. सगळ्यात आधी मी ही गोष्ट समोर आणली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात एक मोठी रणनीती आखली जात आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचार काहीजण करत आहेत, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन ते तीन दिवसांपासून काही गोष्टी समोर येत आहेत. उत्तर प्रदेशचे एक मंत्री असोत किंवा महायुतीचे आमदार राहुल गांधींबाबत अशीच भाषा करत आहेत. राहुल गांधीची तुलना कुणी नंबर एकचे दहशतवादी, अशी केली आहे तर कुणी त्यांची जीभ छाटण्याची भाषा करत आहे. रशियात जे घडले, ते आता इथे आपल्या देशात घडताना दिसते आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी भाजपा, महायुतीसह केंद्र सरकारवर केली आहे. 

घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी अभय दिले

केंद्र सरकार आणि भाजपची चीड तसेच तडफड समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन संविधान संपवले आहे. आता चंद्रचूड जेव्हा निवृत्त होतील तेव्हा याबाबत भाष्य करतील. आधीही या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसले आहे. आम्हाला तारखांवर तारखा देऊन गुंतवले गेले. एका घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी अभय दिले. त्यामुळे काय होते याकडे आमचे अजिबात लक्ष नाही. आम्हाला न्याय मिळणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीला इतर लहान पक्ष येणार आहेत. तिन्ही पक्षाचे नेतेही येणार आहेत. काँग्रेस नेते व्यस्त आहेत. पण त्यांना आम्ही बैठकीला आले पाहिजे. आमची जागावाटपाची चर्चा व्यवस्थित सुरु आहे. त्यातून योग्य तो मार्ग निघेल, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

टॅग्स :संजय राऊतराहुल गांधी