Join us  

Thackeray Vs Shinde: दोन्ही वकील या मुद्द्यावर येतंच नाहीय; शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सुनावणीवर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 6:04 PM

Thackeray Vs Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: सलग तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंर्घषाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तीन दिवसांपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले. न्यायलयाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे वकील मनु सिंघवी मंगळवारी थोडा वेळ घेईन, असं सांगितले. तसेच शिंदे गटाला देखील आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पुरेसा वेळ न्यायालयाकडून दिला जाणार आहे.

आजच्या सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बरीच चर्चा झाली. उद्धव ठाकरेंचा राजीनामा कळीचा मुद्दा बनला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निरीक्षण नोंदवत, उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याऐवजी बहुमत चाचणीला सामोरे गेले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. याच मुद्द्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; पण उज्वल निकम म्हणाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत

संपूर्ण प्रकरणात राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांनी आपल्या अधिकाराचं उल्लंघन केलं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला किंवा नाही दिला, याला माझ्यामते महत्त्व नाही, असं उल्हास बापट यांनी सांगितलं. तसेच जे १६ आमदार पक्षातून बाहेर पडले, ते अपात्र झाले का, हे सर्वोच्च न्यायालयाने आधी बघायला हवं. परंतु सदर मुद्द्यावर येण्याऐवजी दोन्ही वकीलांकडून कायद्याची कीस काढणं सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण युक्तिवाद संपल्यानंतर यावर बोलता येईल. त्यापूर्वी यावर मत व्यक्त करणं योग्य नसल्याचं उल्हास बापट यांनी एक मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं.

दरम्यान, मी हे किंवा ते गृहीत धरतो असे राज्यपाल म्हणू शकत नाहीत. ही घटनात्मक प्रक्रिया आहे. त्यांनी सरकार पाडणे रोखायचे आहे. यावर न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांनी तुम्ही म्हणता की घटनात्मकदृष्ट्या दखल घेणे अनुज्ञेय आहे? असा प्रश्न विचारला. राज्यपाल सरकार पाडण्यात मदत करू शकत नाहीत, असे उत्तर सिब्बल यांनी दिले. तसेच मी ही केस जिंकेन किंवा हरेन, यासाठी मी इकडे उभा नाहीय, तर घटनात्मक नैतिकता टिकण्यासाठी मी इथे उभा आहे, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी भावनिक युक्तिवाद करत भावनिक शेवट केला. 

त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी- सिब्बल

मविआकडे १२३ संख्याबळ आणि विरोधकांकडे १०६ संख्याबळ आहे. आमच्याकडे आजही संख्याबळ आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे तुमच्याकडे बहुमत नव्हते, असे सरन्यायाधीशांनी सिब्बलांना सांगितले. शिवसेनेकडे ५५ पैकी ३८ आमदार बाजुला गेले. यामध्ये १६+२२ ना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे शिवसेनेकडे १७+ राष्ट्रवादीकडे ५३ आहेत. तर काँग्रेसकडे ४४ संख्या आहे. यावर सिब्बल यांनी त्यात जायची गरज नाहीय, कारण आधी त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी होती असे सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेसर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्र सरकार