Join us  

वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेवरील पुलाचा तिढा सुटणार, १९ इमारती वाचणार, एमएमआरडीएकडून चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 3:14 PM

हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. 

 

मुंबई : वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या पुलाच्या संरचनेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. 

एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वेस्थानकाच्या भागात दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वेमार्गिकेवर एक पूल उभारला जाणार आहे. त्यावरून वरळी-शिवडी उन्नत मार्गिका जाईल. यासाठी जगन्नाथ भातणकर मार्गावरील प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंची १३० फूट ते १६० फूट जागेची आवश्यकता होती. मात्र पुनर्वसनाचा अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता. तसेच या पुनर्वसनावर मोठा खर्च अपेक्षित असल्याने एमएमआरडीएने  इमारती बाधित होऊ नये म्हणून पुलाच्या संरचनेत काही बदल करता येतील का, याची चाचपणी सुरू केली आहे. यातून परिसरातील १९ इमारती बाधित होण्यापासून बचावणार आहेत. सद्य:स्थितीत एमएमआरडीएकडून याची सुसाध्यता तपासण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

यामुळे प्रकल्पाला विलंबशिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रे दिशेला जाता यावे यासाठी ४.५ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. 

त्यानुसार जानेवारी २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सद्य:स्थितीत या मार्गाचे केवळ सुमारे ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम असल्याने या प्रकल्पाला विलंब झाला आहे.