Join us

चार रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार, दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 8:26 AM

दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार असून, येत्या तीन वर्षात रेल्वे प्रवाशांना या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

मुंबई: मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकांमध्ये दिवसेंदिवस प्रवासीसंख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 'एमयूटीपी 3 अ' अंतर्गत कांदिवली, मिरारोड, कसारा, नेरळ या चार रेल्वे स्थानकांवर सुधारणेचे काम हाती घेतले आहे. दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार असून, येत्या तीन वर्षात रेल्वे प्रवाशांना या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

स्थानक सुधारणांमध्ये प्रशस्त डेक, पूर्व-पश्चिम जोडणारे पूल, प्रवासी मागणीनुसार तिकीट खिडक्या, अन्य प्रवासी सुविधा, सुनियोजित प्रवेश निर्गम या सुविधांचा समावेश आहे. बोरिवली स्थानकाच्या धर्तीवर या सुधारणा असतील. कांदिवली स्थानकाच्या पश्चिम दिशेला १०.३ मीटर रुंदीचा प्रशस्त डेक उभारण्यात येईल. सर्व पादचारी पुलांची याला जोडणी असेल. यासाठी उत्तर दिशेकडील ६ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचा आणि मध्यभागी असलेल्या ४ मीटर रुंदीच्या पुलाचा विस्तार होणार आहे. मीरा रोड स्थानकात ११ मीटर रुंदीचा डेक उभारण्यात येणार आहे. सध्याचे तिकीटघर, आरक्षण कार्यालय, रेल्वे कार्यालय अन्यत्र हलविले जाणार आहेत.

२ स्थानकांसाठी १२५ कोटींचा खर्च१० मीटर रुंदीच्या पुलाला स्कायवॉकची जोडणी देण्यात येईल. या दोन्ही स्थानकांसाठी १२५ कोटी रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. एमयूटीपी ३ अ' या प्रकल्प संचातील स्थानक सुधारणा या प्रकल्पात १९ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. मार्च २०१९मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. करोनामुळे हा प्रकल्प संच मागे पडला होता. स्थानक सुधारणेतील चार स्थानकांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने रेल्वे स्थानकांचे रुपडे बदलण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प संच आकार घेणार आहे.

३६ महिन्यांत कामे पूर्ण होतीलएमयूटीपी ३ अ स्थानक सुधारणा प्रकल्पातील चार स्थानकांचे काम दिवाळीनंतर सुरु होईल. ३६ महिन्यांत चारही स्थानकांतील कामे पूर्ण होतील. मात्र, काही सुविधा १८ महिन्यांतच प्रवाशांन वापरण्यास उपलब्ध होतील.- सुभाषचंद गुप्ता, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

टॅग्स :रेल्वे