Join us

महाराष्ट्रद्वेष्टा माणूस त्याला हाकलूनच दिले पाहिजे; उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 7:43 PM

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान होऊनही गप्प बसणारे बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकतो का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. खरेतर हा महाराष्ट्रद्वेष्टा माणूस आहे त्याला हाकलूनच दिले पाहिजे अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. षण्मुखानंद येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रद्वेष्टा माणूस याला हाकलून दिले पाहिजे. महापुरुषांचा अपमान करणारा हा माणूस आहे. उशीरा सुचलेले शहाणपण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान होऊनही गप्प बसणारे बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकतो का? ही सगळी नाटके संपवण्याची वेळ आलीय. हे सगळे दगड आहेत. भाजपा दगडाचा वापर करतेय. काम झाल्यावर तेही टाकून जाणार असं त्यांनी सांगितले. 

मुंबईला कंगाल करा, रिकामी करा हे भाजपाचं धोरण२००२ पर्यंत मुंबई महापालिका ६५० कोटी तोट्यात होती. त्यानंतर आपले नगरसेवक, महापौर, प्रशासकीय अधिकारी यांच्या मेहनतीनं आता महापालिका नफ्यात आहेत. ठेवी वाढल्यात. राज्यातले उद्योग गुजरातला जातायेत. मुंबईकरांच्या जनतेचा पैसा ठेवी म्हणून आहेत. कोस्टल रोड जो निर्माण होतोय तो विना टोल असणार आहे. त्यावर नागरिकांना टोल लागणार नाही. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड असे अनेक प्रकल्प हे मुंबई महापालिकेच्या FD वापरला जात आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. 

जर हा पैसा खाली केला. मुंबई सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही बघताय पण आम्ही मातृभूमी म्हणून बघतोय. मुंबईला कंगाल करा, रिकामी करा त्यासाठी मुंबई पाहिजे. बुरी नजरवाले तेरा मुंह काला आम्ही करणारच. रक्त सांडून मराठी माणसाने मुंबई उभारली. ती लुटून देणार नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन हे पुढे जाणार? असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेभगत सिंह कोश्यारीभाजपा