Join us  

आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 1:38 PM

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मसनेप्रमुख राज ठाकरे यांची सरकार स्थापन झाल्यापासून अनेकवेळा भेटीगाठी होत आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मात द्यायची तर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे सोबत असावी असे मानणारे भाजपमध्ये काही नेते आहेत. दुसरीकडे राज यांना सोबत घेऊन अधिक फायदा होईल की ते विरोधात लढले तर अधिक फायदा होईल याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घ्यावा असे काही नेत्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या वतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मनसे वेगळी लढल्यास होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल की शिवसेनेच्या याचाही अभ्यास केला जात आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी केलं आहे.

दरम्यान, शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत मी बोलणार नाही. परंतु एकत्र येऊन काम करणे ही काळजी गरज आहे. आम्हाला मुंबईकरांचे जीवन सुखी करायचे आहे, असं दीपक केसरकर म्हटलं आहे. तसेच परस्परांना सहकार्य करण्याचे राजू पाटील यांच्या वक्तव्याचे मी आभार आहे, असंही दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

...तर आम्हीही तयार असू- राजू पाटील

हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत आहे. आम्ही काही सत्तेत नाही. सत्तेत बसायच्या आधी आम्ही भाजपला मतदान केलं होतं. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केलं होतं.

मुंबईत एकत्र, इतरत्र स्वतंत्र?

१. मनसेला मुंबईत सोबत घ्यावे आणि ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ते वेगळे लढले तरी चालेल अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी आणि विशेषतः पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांनी पक्षाकडे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

२. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत. फक्त मुंबईत युती केली तर मुंबईच्या प्रचारात ते भाजपचे कौतुक करतील आणि अन्यत्र युती नसेल तर जोरदार टीका करतील. त्यामुळे विसंवादाचे चित्र निर्माण होईल. तसेच राज ठाकरेदेखील युतीचा असा प्रस्ताव मान्य करणार नाहीत असे या वरिष्ठ नेत्यांना वाटते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेराज ठाकरेदेवेंद्र फडणवीस