Join us  

मुंबईतील सीसीटीव्हीचा दुसरा टप्पा अधिक प्रगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 11:54 AM

आजची मुंबई भयमुक्त आहे. महिलांसाठीही मुंबई हे देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक सुरक्षित शहर आहे.

 

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला २६/११ चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या हल्ल्यानंतर एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यातील शिफारशींनुसार मुंबईतसीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम आमच्या शासनाच्या कालावधीत वेगाने पूर्ण करण्यात आले. याचाच दुसरा टप्पादेखील सुरू करण्यात येत आहे. हा टप्पा अधिक प्रगत आणि प्रभावशाली असणार आहे. सागरी सुरक्षेतील अडथळे, त्रुटी दूर करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताजमहल पॅलेस येथे पाञ्चजन्य आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ हा कार्यक्रम झाला. यावेळी फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली.  फडणवीस म्हणाले, मुंबईवर झालेला २६/११चा हल्ला अतिशय सुनियोजित होता. पर्यटक, राजदूत अशा काही घटकांना विशेष करून लक्ष करण्यात आले; पण या हल्ल्यानंतर मुंबईकरांच्या अभूतपूर्व एकजुटीचे दर्शन घडले. मुंबई पुन्हा एकदा नव्या दमाने लगेच उभी राहिली. मुंबईला नमविण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे मुंबईकरांनी उधळून लावले. आता जर आपल्यावर कोणी हल्ला करेल तर त्याला सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करण्यात येईल हा इशारा आपण कृतीतून देऊन आक्रमक दृष्टिकोन घडवला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

आजची मुंबई भयमुक्त आहे. महिलांसाठीही मुंबई हे देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. अर्थातच याचे श्रेय शासनाबरोबरच मुंबईकरांनाही नक्कीच आहे, कारण मुंबईकर शिस्तीला खूप महत्त्व देतात, असेही देवेंद्र फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईसीसीटीव्ही