Join us  

मुंबईतील असह्य उकाडा काही केल्या कमी होईना! तापमानाचा पारा चढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 2:12 AM

मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर असून, आर्द्रता मात्र अधिक आहे.

मुंबई : मान्सून विलंबाने का होईना आगेकूच करत असतानाच दुसरीकडे राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. मागील आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा खेळ सुरू असून, आता पुढील चार दिवसांसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत मात्र तापमानाचा पारा चढाच असून उकाडा कायम आहे.  

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई ३४ अंशांवर      मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर असून, आर्द्रता मात्र अधिक आहे. परिणामी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.        मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांचा अशाच काहीशा तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे.

मान्सून कुठे आला? मान्सून बंगालच्या उपसागराच्या काही भागांत, अग्नेय भाग, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, अंदमानचा समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या पुढे सरकला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव, कोमोरिनची बेटे, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल आहे.कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :मुंबईउष्माघात