शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. १३ तारखेला झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर कोर्टाने ताशेरे ओढले होते. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला विलंब होतोय, तुम्ही या प्रक्रियेचे वेळापत्रक द्या नाहीतर आम्हाला यासाठी २ महिन्याचा कालावधी द्यावा लागेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होते. यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाशी मी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ देणार नाही, असे म्हटले होते.
आजच्या सुनावणीवरील प्रश्नावर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांनी घटनाबाह्य काय झालंय हे समजायला तर हवं, त्याशिवाय न्यायालयाची कारवाई कशी होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. मॅटर सबज्युडिस आहे आणि थोड्याच वेळात सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू मांडली जाणार आहे. घटनाबाह्य काय झालंय हे समजायला तर हवं, त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाची कारवाई कशी होणार, असा सवाल नार्वेकर यांनी केला आहे.
संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत, हे निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी होत असते. त्यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची सवय आहे. अशा प्रवृत्तीला उत्तर न देणे, प्रोत्साहन न देणे हा उत्तम उपाय आहे. आमचा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात केला जाईल, असेही ते म्हणाले.