सलग तिस-या दिवशी मर.रे विस्कळीत, सिग्नल बिघडल्याने वाहतूक उशीराने
By admin | Published: May 27, 2016 07:28 AM2016-05-27T07:28:15+5:302016-05-27T07:30:57+5:30
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
ऑनालाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - 'रोज मरे त्याला कोण रडे' ही उक्ती सध्या मध्य रेल्वे (म.रे) बाबतीत खरी ठरताना दिसत आहे. बुधवार रात्री सायनजवळ झालेला बिघाड, त्यानंतर काल म्हणजे गुरूवारीही वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर मध्य रेल्वेवर शुक्रवारी सलग तिस-या दिवशी बिघाडाचे सत्र सुरूच आहे. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
पावसाला अद्याप सुरूवात झालेली नसतानाही मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आजही सकाळी ऐन गर्दीच्या वेळेसच रेल्वे वाहतूक खोळंबल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागेल असे दिसते. अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.