Join us  

‘त्या’ सात डॉक्टरांना अखेर मान्यता

By admin | Published: October 17, 2015 2:48 AM

पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण झाल्यावर भारतात स्थलांतरित झालेल्या सात डॉक्टरांना तब्बल २० वर्षांनी मुंबईत प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळाली आहे.

पूजा दामले, मुंबईपाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण झाल्यावर भारतात स्थलांतरित झालेल्या सात डॉक्टरांना तब्बल २० वर्षांनी मुंबईत प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. ‘त्या’ सात डॉक्टरांची नोंदणी केल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी सांगितले. त्यामुळे ‘ते’ सात डॉक्टर आणि मुंबईत प्रॅक्टिस करू शकणार आहेत. गेली २० वर्षे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) नोंदणी मिळण्यासाठी हे सात डॉक्टर झगडत होते. एमएमसीने सहा महिन्यांपासून या डॉक्टरांच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरू केले होते. अशा प्रकारे स्थलांतरित डॉक्टरांना नोंदणी देणारी देशातील पहिली परिषद आहे. पाकिस्तानातील कराची, बलुचिस्तान अशा ठिकाणाहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर २० ते २५ वर्षांपूर्वी काही डॉक्टर भारतात स्थलांतरित झाले. त्यानंतर या डॉक्टरांना भारतीय नागरिकत्व मिळाले. भारताचे नागरिक म्हणून मिळणारे सर्व हक्क, सुविधांचा लाभ त्यांना मिळत होता. पण त्यांना भारतात ‘डॉक्टर’ म्हणून मान्यता मिळाली नाही. त्यामुळे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करूनही या डॉक्टरांना डॉक्टर म्हणून स्वतंत्रपणे काम करता येत नव्हते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया, कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून गेल्या २० वर्षांत परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे या डॉक्टरांना स्वतंत्र प्रॅक्टिस करणे शक्य नव्हते. गेली २० वर्षे हे डॉक्टर मुंबईतच राहत आहेत. पण, हे डॉक्टर एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली काम करणे, दुसरा व्यवसाय अथवा दुसरीकडे नोकरी पत्करून उदरनिर्वाह करत असल्याचे डॉ. टावरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.