Join us  

मुंबईचा तामिळनाडूवर रोमांचक विजय

By admin | Published: October 19, 2015 1:31 AM

श्वास रोखून धरुन लावणाऱ्या रंगतदार सामन्यात यजमान मुंबईने आपल्या ‘खडूस’ खेळीचे प्रदर्शन करताना तामिळनाडूचा अवघ्या एका विकेटने रोमांचक पराभव केला.

मुंबई : श्वास रोखून धरुन लावणाऱ्या रंगतदार सामन्यात यजमान मुंबईने आपल्या ‘खडूस’ खेळीचे प्रदर्शन करताना तामिळनाडूचा अवघ्या एका विकेटने रोमांचक पराभव केला. या विजयासह मुंबईने यंदाच्या रणजी मोसमात सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत ‘ब’ गटात १४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली.मुंबईतील एमसीएच्या बीकेसी मैदानावर झालेल्या या सामन्यात तामिळानाडूने चौथ्या दिवशी ७ बाद ७३ या धावसंख्येवरुन केल्यानंतर मुंबईकरांनी त्यांचा डाव ९५ धावांत गुंडाळला. पहिल्या डावात १४० धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईला विजयासाठी २३६ धावांचे आव्हान मिळाले. फिरकी गोलंदाजांसाठी पोषक झालेल्या खेळपट्टीवर अखेरच्या दिवशी मिळालेले हे लक्ष्य अत्यंत अव्हानात्मक होते. मात्र मुंबईकरांनी आपला खडूसपणा दाखवताना तामिळनाडूच्या हातातील सामना हिसकावून ब गटात अग्रस्थानी झेप घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातच निराशाजनक झाली. सलामीवीर श्रीदीप मांगेला भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर अखिल हेरवाडकर आणि श्रेयश अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करुन मुंबईला सावरले. यानंतर ठराविक अंतराने मुंबईकर बाद होत गेले. कर्णधार आदित्य तरे आणि पहिल्या डावातील दिडशतक झळकावणारा सिध्देश लाड यांनाही फारशी चमक न दाखवता आल्याने मुंबई समोर अडचणी वाढल्या. मात्र अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांच्या निर्णायक अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने आपल्या आशा जिवंत ठेवल्या.मुंबईचा डाव ७ बाद २०८ धावा असा घसरल्यानंतर अभिषेक राऊतने शेवटच्या फळीला हाताशी धरत २२ धावा काढल्या. संपूर्ण सामन्यात दोन्ही डावांत मिळून १२ बळी घेऊन मुंबईच्या विजयात निर्णायक कामगिरी करणाऱ्या विशाल दाभोळकरला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)