Join us  

२१ केबल चालकांचे सिग्नल बंद

By admin | Published: January 06, 2016 1:09 AM

डिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसविणे सरकारने बंधनकारक केले होते. सेट टॉप बॉक्स बसविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरला संपली आहे.

अलिबाग : डिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसविणे सरकारने बंधनकारक केले होते. सेट टॉप बॉक्स बसविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरला संपली आहे. कारवाईचा बडगा म्हणून सरकारने जिल्ह्यातील २१ (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) बहुविध यंत्रणा परिचालकांचे सिग्नल बंद केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २५ हजार ६५१ ग्राहकांचे टेलीव्हिजन सेट डेड झाले आहेत. ही आकडेवारी १७ डिसेंबरपर्यंतची असून, त्यामध्ये वाढ झाल्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यात २१ मल्टी सिस्टीम आॅपरेटर असून, त्यांच्या खाली ५८९ केबल आयोजक आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांची एकूण संख्या ही एक लाख २३ हजार ८०४ अशी आहे. ग्रामीण भागामध्ये डिजिटलायझेशन करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१६ आहे.सेट टॉप बॉक्स बसविण्यात सुसूत्रता यावी, यासाठी जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि सहा नगरपंचायती, त्याचप्रमाणे ५९ महत्त्वाच्या गावांमधील ग्राहकांचा विचार प्रथम करण्यात आला आहे. येथे एकूण ७६ हजार ५५ ग्राहक आहेत. पैकी ५० हजार ४०४ ग्राहकांनी वेळेच्या मुदतीमध्ये सेट टॉप बॉक्स लावला आहे. अद्यापही २५ हजार ६५१ ग्राहक बाकी आहेत. ही आकडेवारी १७ डिसेंबर २०१५ पर्यंतची आहे. उरलेल्या दिवसांमध्ये ज्या ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स लावला असेल त्यांचे प्रमाण आताच सांगता येणार नसून, ते कमी असण्याची शक्यता करमणूक विभागाचे मधुकर बेलोसकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)