Join us

कांदिवलीत दोन रिक्षाचालक ठार

By admin | Published: October 31, 2015 12:45 AM

कांदिवलीत झालेल्या अपघातात दोन दिवसांत दोन रिक्षाचालकांना जीव गमवावा लागला आहे तर तीन जण जखमी झाले असून शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

मुंबई : कांदिवलीत झालेल्या अपघातात दोन दिवसांत दोन रिक्षाचालकांना जीव गमवावा लागला आहे तर तीन जण जखमी झाले असून शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी समता नगर आणि कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून बेस्टचालक अटकेत आहे.कांदिवली परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक दहिसर येथून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज महिंद्रा कंपनीजवळील गेटसमोर पोहोचताच ट्रकचालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. दुभाजकाला धडक देत ट्रकचालकाने समोर येणाऱ्या बाइक आणि रिक्षाला चिरडले. यात रिक्षाचालक श्रीरोधर महांतो जागीच ठार झाला तर प्रवासी महिलेसह तिचा मुलगा आणि दुचाकीस्वार यामध्ये जखमी झाले. शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला होता. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास घेत आहेत. त्यापूर्वी बुधवारी रात्रीच्या सुमारास मालाड ते बोरीवलीकडे जाणाऱ्या वाहिनीवर वळण घेत असताना बेस्टच्या जोरदार धडकेत रिक्षाचालक मेवालाल जैसवालचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी बेस्ट चालक भगवान कणसे (४३) याला पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)