Join us  

Uddhav Thackeray: रावणाचा जीव बेंबीत होता, तसं काहींचा जीव मुंबईत, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:11 PM

मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातील राज्यपालांच्या अभिभाषणाचा उल्लेख केला.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पुन्हा एकदा विधानसभेत भाषण केलं. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाईविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. प्रतिमा मलिन करणे आणि बदनामी करणे हे कुठल्या थराला जाऊन करणार आहात. हा धृतराष्ट्र नाही छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या वाटेला जावू नका. त्यातून कुणाचंही भले होणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभागृहात दिला. यावेळी, मुंबईवरुन केंद्रातील भाजप नेत्यांवरही प्रहार केला. 

मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातील राज्यपालांच्या अभिभाषणाचा उल्लेख केला. तसेच, राज्यपालांना भाषणही वाचू दिलं नाही, हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर, राज्य सरकारने कोविड काळात केलेल्या कामाचं कौतूक करताना ऑक्सीजनसाठी गाड्या एअरलिफ्ट केल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. तसेच, कोविड काळात तब्बल 8 कोटी शिवभोजन थाळ्यांचं वाटप आपण केलय. पण, यातही काही जणांना भ्रष्टाचार दिसून येईल, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.

सुधीरभाऊ तुम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणलात. आपल्या विदर्भाच्या बाजुला मध्य प्रदेश आहे, त्याची आकडेवारी वाचतो, त्यास मद्य प्रदेश म्हणताल का तुम्ही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विचारला. तुम्ही आमच्यावर टीका करा, पण महाराष्ट्राला बदनाम करणं योग्य नाही. टिका करा, टोकाला जाऊन करा. रावणाचा जीव बेंबीत होता, तसं काहींचा जीव मुंबईत आहे. त्यांना केंद्रात सरकार मिळालं, तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, असे म्हणत नाव न घेता अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला. मुंबईसारखं शहर नाही, मुंबईचा मला अभिमान आहे. माझ्या मुंबईत आम्ही जे करू ते जगातलं सर्वोत्तमच असलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच, मुंबईने केलेल्या विकासकामांचा उल्लेख करताना मुंबईतील महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेबद्लची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

हर्षवर्धन पाटील यांनाही लगावला टोला

हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती मग त्यांनी झोप लागायचं औषध घेतले. भाजपाकडे असं कोणतं झोपेचे औषध आहे. आम्ही दाऊदची माणसं, भ्रष्टाचारी असं म्हणता. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन अंगावर काय येता? हा नामर्दपणा आहे. हिंमत असेल समोर या, घरच्यांवर कसले आरोप करता? महाभारतातील श्रीखंडी होता त्यासारखं कशाला काम करता? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला(BJP) विचारला आहे.

मला तुरुंगात टाका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, मी घाबरलोय म्हणून असं बोलत नाही. जे काही मतभेद असतील तर सांगा, पण बदनामी करू नका. सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका. मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात... कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही. 

बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं

बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं मग त्यांच्याकडे जाऊन काय उत्तर देणार? 2014 मध्ये युती तुम्ही तोडली. मी तेव्हाही हिंदू होतो. तुरूंगात टाकणार असाल मला टाका, सगळ्यांची जबाबदारी मी घेतो. 1993 मध्ये ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, हिंदूंना वाचवलं. तेव्हा अनिल परब यांना रस्त्यावर मारहाण झाली होती. त्यांचा बंगला तोडणार का? राज्यात अघोषित आणीबाणी लादली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलं.  

टॅग्स :उद्धव ठाकरेविधानसभाविधान भवनमुंबई