तलवाडा : पावसाची रिमझिम सुरू झाल्याने नागरिकांनी छत्री खरेदी सुरू केली असून आपापल्या बजेटनुसार छत्र्यांची खरेदी सुरू केली आहे. विक्रमगड व परिसरात जूनच्या शेवटच्या आठवडयापासून ते पुढील दोन महिने पावसाचे प्रमाण जास्त असते. अशावेळी छत्री व रेनकोटची गरज असते. मात्र यंदा वाढलेल्या महागाईचा फटका छत्री खरेदी करतानाही जाणवत असून वीस ते पन्नास रुपयांनी छत्रीचे दर वाढले आहेत. फोल्डपासून ते लांब दांड्याच्या रंगीबेरंगी आकारातील डिझाईनमध्ये छत्र्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. १५0 ते ६00 रुपयांपर्यंतच्या दरात उपलब्ध आहेत़ पावसाळ्याच्या आगमनाची जोरदार तयारी विक्रमगड व परिसरात सुरु झाली असून बच्चे कंपनीपासून ते लहान मोठ्यापर्यंत त्याची झळ पोहचलेली दिसत आहे. कौलांची स्वच्छता, कौलांवर अगर ज्या बाजूस गळण्याचा संभव आहे़ तेथे प्लास्टीकचे कापड घालणे, डांबर घालणे या कामांना सध्या वेग आला आहे़ याचबरोबर बच्चे कंपनीची शाळा सुरु झाली असून, त्यामुळे पालकांसह बच्चे कंपनीचा मोर्चा खरेदीकडे वळला आहे. (वार्ताहर)
छत्री खरेदीची लगीनघाई
By admin | Published: June 17, 2014 12:41 AM