बेभान कार्यकर्त्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष!
By admin | Published: October 13, 2014 03:47 AM2014-10-13T03:47:00+5:302014-10-13T09:06:13+5:30
बाईक रॅलीत मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असून अशा बाईकस्वारांवर झालेली कारवाई अगदी नगण्य आहे.
सुशांत मोरे, मुंबई
विधानसभेच्या शर्यतीतील उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचता यावे, यासाठी मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढण्यात येतात. पण या बाईक रॅलीत मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र शहरासह उपनगरांत दिसले. पण अशा बाईकस्वारांवर झालेली कारवाई पाहता ती अगदी नगण्य असून, अशा फक्त १०१ जणांविरोधात दंड आणि समन्स वाहतूक पोलिसांनी बजावल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात धामधूम सुरू आहे. सभांबरोबरच प्रचार फेऱ्या, बाईक रॅली काढण्यावरही उमेदवारांकडून भर दिला जात आहे. यंदा उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे प्रचार फेऱ्या आणि बाईक रॅलीही मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्या. मुंबईत तर ३ हजार ५२४ अर्ज बाईक रॅलींसाठी वाहतूक पोलिसांकडे आले. मात्र या बाईक रॅलींचे आयोजन करताना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कुठलेही भान राहिले नसल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीत सहभागी बाईकस्वारांकडून सररास वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. विना हेल्मेट आणि एकाच बाईकवरून तीन जणांचा प्रवास या रॅलीत होत होता. तसेच कर्णकर्कश हॉर्नही बाईकस्वारांकडून वाजवण्यात येत होते. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत बाईकस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही त्याविरोधात कारवाई होताना दिसत नव्हती. गेल्या काही दिवसांत मुंबई वाहतूक पोलिसांकडून २५ चौक्यांमधून अवघ्या १०१ जणांविरोधात दंडात्मक आणि समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.