Join us  

हायवेवर विनाहेल्मेट दुचाकीस्वार सुसाट

By admin | Published: February 08, 2016 3:01 AM

दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आल्यानंतर त्याचे एकीकडे स्वागत होतानाच दुसरीकडे विरोधही केला जात आहे.

मुंबई : दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आल्यानंतर त्याचे एकीकडे स्वागत होतानाच दुसरीकडे विरोधही केला जात आहे. महत्त्वाची बाब हेल्मेटसक्तीचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आल्यानंतरही त्याची कठोर अंमलबजावणी अद्याप न झाल्यानेच महामार्ग आणि शहरांत विनाहेल्मेट प्रवास सुसाट होत असल्याचे समोर आले आहे. २0१५मध्ये ८ लाखांपेक्षा जास्त दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घातल्याबाबतची कारवाई महामार्गांवर करण्यात आली आहे. तर मुंबईसारख्या शहरातही विनाहेल्मेट प्रवास बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे वाहतूक पोलीस अधिकारी सांगतात. विनाहेल्मेट प्रवास दुचाकीस्वारांकडून होतानाच एखाद्या गंभीर अपघातालाही तोंड द्यावे लागते आणि यात प्राणही गमवावा लागतो. त्यामुळे मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम १२९नुसार दुचाकीस्वार चालकाबरोबरच त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत २00३मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखलाच परिवहन विभागाकडून देण्यात आला. मात्र आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यास परिवहन विभागाला १२ वर्षे का लागली, असा प्रश्न सध्या पडला आहे. या आदेशाची आधीच कठोर अंमलबजावणी झाली असती तर सध्या होत असलेला विनाहेल्मेटचा सुसाट प्रवास झाला नसता, असे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. वर्ष २0१५मध्ये विनाहेल्मेटच्या जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त केसेस महामार्ग पोलिसांकडे दाखल आहेत. २0१४शी तुलना केल्यास वर्ष २0१५मध्ये भरमसाठ वाढ झाल्याचेच दिसते. २0१४मध्ये ६ लाख ३१ हजार ७७२ केसेस झाल्या आहेत. मुंबईतील दुचाकीस्वारांनीही हेल्मेट घालून प्रवास करण्याकडे पाठच केली आहे. ५ वर्षांत विनाहेल्मेट प्रवासाच्या जवळपास ११ लाख ९३ हजारहून अधिक केसेस दाखल झाल्या आले. मुंबईत दरवर्षी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरील कारवाईच्या सरासरी २ लाख केसेसची नोंद होत आहे. यात आतापर्यंत १० कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)मुंबईतील दुचाकीस्वारांनीही हेल्मेट घालून प्रवास करण्याकडे पाठच केली आहे. पाच वर्षांत विनाहेल्मेट प्रवासाच्या जवळपास ११ लाख ९३ हजारपेक्षा जास्त केसेस झाल्याचे सांगण्यात आले.