Join us

"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 2:00 PM

उद्योगपती रतन टाटा यांच्या विषयी आठवणी सांगताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Piyush Goyal Gets Emotinal : भारतीय उद्योगपती रतन नवल टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांमध्ये शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुंबईतील वरळी येथील पारशी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र रतन टाटा यांच्या निधनाने सामान्यांपासून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीमध्ये खूप काही गमावल्याची भावना निर्माण झाली आहे. अशातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनाही रतन टाटांविषयी बोलताना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. रतन टाटांची जुनी गोष्ट आठवून पीयूष गोयल यांना अश्रू अनावर झाले.

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर देशासह जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.  रतन टाटांविषयी आठवणी सांगताना प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करत आहेत. रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही मीडियाशी संवाद साधताना रतन टाटांशी संबंधित एक जुनी घटना सांगितली. ही घटना सांगत असताना उद्योगपती टाटांची आठवण करून पीयूष गोयल रडू लागले.

एएनआय दिलेल्या मुलाखतीमध्ये गोयल यांनी टाटा त्यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते त्यावेळची घटना सांगितली. 'मला आठवतं की ते एकदा मुंबईत नाश्त्यासाठी घरी आला होते. तेव्हा आम्ही त्यांना साधी इडली, सांबार, डोसा दिला होता. पण त्यांना याचं खूप कौतुक वाटलं. त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम शेफ असतील. पण त्या साध्या नाश्त्याचे त्यांना खूप कौतुक वाटले. नाश्ता देणाऱ्या व्यक्तीशीही ते खूप नम्रपणे बोलते होते, अशी आठवण गोयल यांनी सांगितली.

"ते घरातून बाहेर पडत असताना, खूप सुंदर दोन तास एकत्र घालवल्यानंतर, त्यांनी माझ्या पत्नीला प्रेमाने विचारले - तुला माझ्यासोबत एक फोटो काढायला आवडेल का? आम्हाला खरोखर हे करायचे होते, पण विचारण्यास लाज वाटत होती. त्यांनीच आम्हाला ही ऑफर दिली. या छोट्या गोष्टींच त्यांना रतन टाटा बनवतात ज्यांच्यावर १४० कोटी भारतीय आणि संपूर्ण जग प्रेम करतो," असेही पीयूष गोयल म्हणाले.

"रतन टाटा हे अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांनी टाटा समूहाची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापना करून भारतालाही गौरव मिळवून दिला. त्यांचे व्यक्तिमत्व सेवाभावी होते. ते प्रत्येक चांगल्या कामासाठी सदैव तत्पर होते. जेव्हा देश कोविड महामारीशी झुंजत होता, तेव्हा रतन टाटा यांनी १५०० कोटी रुपयांची देणगी कोणत्याही अटींशिवाय दिली होती. यामुळे आम्हाला कोविड विरुद्धच्या लढाईत मदत झाली. ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी केवळ व्यवसायाला नवीन उंचीवर नेले नाही तर टाटा समूहाला एक जिवंत उदाहरण बनवले आणि दाखवून दिलं की प्रामाणिक राहून उद्योग कसा मोठा होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा जाऊ शकतो," असेही पीयूष गोयल यांनी म्हटलं.

टॅग्स :रतन टाटाटाटापीयुष गोयल