Join us

१५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 6:43 AM

निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार १५ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. रुग्ण वाढताना दिसले तर मास्क सक्तीसह अन्य निर्बंधांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत दिले. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कोरोना काळात उभारलेली फिल्ड हॉस्पिटल व्यवस्थित आहेत का? पुरेसे कर्मचारी व सुविधा आहेत याची खात्री करून घ्या. लवकरच शाळा सुरू होतील. त्यामुळे शाळांतील संसर्गाची माहिती करून घ्या.     - मुख्यमंत्री

दीड महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या सात पटीने वाढून ४,५०० वर गेली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर ६% तर राज्याचा ३ टक्क्यांवर गेला आहे, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

ठाकरे यांचे आवाहन

  1. ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास कोरोना चाचणी करून घ्या.
  2. गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरा.
  3. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे; ते वाढवा.
  4. १२-१८ वयोगटातील लसीकरण वाढवा.
  5. ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करून ठेवा.
टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे