महापालिकेतही पाणी प्रश्न पेटला

By admin | Published: April 22, 2016 02:25 AM2016-04-22T02:25:41+5:302016-04-22T02:25:41+5:30

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही महिने उरले असताना शिवसेना-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत़ रस्ते घोटाळा, टँकरमाफिया अशा अनेक विषयांमध्ये उभय पक्षांनी

Water question in municipal corporation | महापालिकेतही पाणी प्रश्न पेटला

महापालिकेतही पाणी प्रश्न पेटला

Next

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही महिने उरले असताना शिवसेना-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत़ रस्ते घोटाळा, टँकरमाफिया अशा अनेक विषयांमध्ये उभय पक्षांनी परस्परांना लक्ष्य केले आहे़ एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खचणार नाही, असे शिवसेनेने ठणकावले़, तर दुसरीकडे हे आव्हान स्वीकारून भाजपाने ही तर नुसती सुरुवात आहे, असा इशारा मित्रपक्षाला दिला आहे़ त्यामुळे निवडणुकीपूर्वीच युतीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे़ सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पाणीगळती, टँकरमाफिया या मुद्द्यांवर भाजपाने शिवसेनेला धारेवर धरले आहे.
स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने राज्यात सत्तेवर असलेल्या आपल्या सरकारचा पुरेपूर फायदा उठवत प्रत्येक कामाचे के्रडिट घेण्यास सुरुवात केली आहे़ बेस्ट उपक्रमाच्या कमी अंतराच्या प्रवासी भाड्यामध्ये घट करण्याचा निर्णय घेऊन भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केली.त्यानंतर अशा धक्क्यांची मालिका सुरूच ठेवत भाजपाने शिवसेनेच्या नाकी नऊ आणले आहेत.त्यामुळे शिवसेनेनेही मित्रपक्षावर हल्लाबोल केला आहे़
पालिकेच्या पाण्याची विक्री करून टँकरमाफिया गबर झाल्याचा आरोप भाजपाने बुधवारी केला़ त्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजय मेहता यांची गुरुवारी भेट घेऊन टँकरमाफियांवर कारवाईची मागणी केली़ मुंबईत दररोज वाया जाणाऱ्या २७ टक्के बेहिशोबी पाण्यामध्ये १२ ते १५ टक्के टँकरमाफियांच्या घशात जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे़ (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांना असा होणार फायदा
टीडीएलआरमुळे शहर भागातील बेस्टच्या वीज ग्राहकांचे बिल २५ टक्क्यांनी वाढले होते़ मात्र यामध्ये आता २० टक्के कपात झाल्यास प्रति युनिट ११ रुपये ४५ पैशांऐवजी शहरातील दहा लाख वीज ग्राहकांना आठ रुपये ३० पैसे मोजावे लागतील, असा दावा शेलार यांनी केला आहे़
मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ यामध्ये २७ टक्के पाणी वाया जात आहे़ यापैकी १२ ते १५ टक्के पाणी चोरी व गळती होत असून उर्वरित १२ ते १५ टक्के टँकरमाफियांना विकले जात आहे़
अधिकारी आणि राजकीय हस्तक टँकरमाफियांमार्फत या पाण्याची विक्री करीत आहेत़ असे सुमारे ५६३ दशलक्ष लीटर पाणी दररोज तर महिन्याला १६ हजार ८९० दशलक्ष लीटर पाण्याची ३०० टक्के दराने विक्री होत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे़
टँकरमाफियांची ‘चांदी’
झोपडपट्ट्यांमध्ये प्रति हजार लीटर पाण्यासाठी ३ रुपये ८६ पैसे पालिका आकारत असते़ म्हणजेच दहा हजार लीटर पाण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना ३९ रुपये मोजावे लागतील़ मात्र टँकरमाफिया या पाण्यासाठी दीड हजार रुपये नागरिकांकडून उकळत आहेत़ इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना प्रत्येक हजार लीटरसाठी चार रुपये ६६ पैसे आकारण्यात येतात़ तेही दीड हजार रुपये देत आहेत़
भाजपाचा शिवसेनेवर हल्लाबोल
रस्ते घोटाळ्याचा अहवाल सादर न केल्यास आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे़ यावर भाजपाने शिवसेनेवर हल्लाबोल करीत अविश्वास ठराव आणून आपली जबाबदारी झटकता येणार नाही.
केवळ करून दाखविल्याचे क्रेडिट घेता, मग न केल्याची जबाबदारीही घ्या, भाजपाचा आयुक्तांवर विश्वास आहे़
भाजपाच्या पत्रामुळेच आयुक्तांनी चौकशी करून घोटाळा उघड केला़ म्हणूनच अविश्वास ठराव आणत आहेत का, असा टोला शेलार लगावत ही सुरुवात आहे, असा शिवसेनेला इशारा दिला़
शिवसेनेचे प्रत्युत्तर
सत्तेत असताना रस्त्याच्या चौकशीचे पत्र पाठवून महापौरांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे़ भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे शिवसेना खचणार नाही़ अन्यथा फौजदारी दावा करू
सात वर्षांपासून पाणीगळती रोखण्याचे कंत्राट काढण्यास टाळाटाळ सुरू आहे़ हे रॅकेट चालण्यामागे उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
या प्रकरणी महिन्याभरात आयुक्तांनी चौकशी करून कारवाई न केल्यास फौजदारी दावा दाखल करू, असा इशारा शेलार यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे़ तसेच वेळ आल्यावर अधिकाऱ्याचे नावही उघड करण्याची तयारी दाखविली आहे़
भाजपाचा-शिवसेनेला दुसरा दणका
शिवसेनेकडे बेस्ट समितीचे अध्यक्षपद असताना दोन वर्षांत तीन भाडेवाढ आणि वीज ग्राहकांना परिवहन तूट वसुलीचा भुर्दंड सहन करावा लागत होता़ ही वाढ कमी करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न निष्फळ ठरले़
मात्र भाजपाकडे बेस्ट समितीचे अध्यक्षपद येताच कमी अंतराचे प्रवासी भाडे कमी करण्याबरोबरच टीडीएलआर म्हणजेच परिवहन तूट वसुलीतही २० टक्के कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे़
भाजपा शिष्टमंडळाच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची घोषणा करीत शेलार यांनी शिवसेनेला दणका दिला़ त्यांचे अपयश भाजपाने आपल्या डोक्यावर का घ्यावे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे़

Web Title: Water question in municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.