Join us  

"आम्ही भोंग्याचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही ४ दिवस फटाके सहन करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 1:22 PM

दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा अनेकांची बनली आहे

मुंबई - दिवाळी हा आनंदाचा आणि दिव्यांनी प्रकाशमान होण्याचा सण. घरोघरो मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जाते. गरीबाच्या झोपडीपासून ते गर्भश्रीमंतांच्या घरातही दिवे, लायटींग पाहायला मिळते. दिवाळी फराळ आणि गोडधोड पदार्थांची चव चाखायला मिळते. जुन्या मित्र-मैत्रीणींची मैफील जमत असते. एकंदरीत सगळीकडे उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. मात्र, दिवाळीतील फटाके उडवण्यावरुन नेहमीच वाद होत असतो. पर्यावरणवादी आणि काही सेलिब्रेटी दिवाळीच्या फटाक्यांवर आक्षेप घेत असतात. आता, फटाके उडविण्यास विरोध करणाऱ्यांना मनसेनं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.  

दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा अनेकांची बनली आहे. त्यामुळेच, दिवाळीला फटाके उडवूनच पहिल्या अंघोळीची सुरूवात केली जाते. अभ्यंगस्नानाला, पाडव्याला, भाऊबीजेला फटाके उडवूनच दिवाळी साजरी होते. मात्र, दिवाळीचे फटाके उडवताना काळजी घ्यायला हवी. कारण, एकीकडे ध्वनी आणि वायू प्रदुषणामुळे दिवाळीच्या फटाक्यांवर बंदीची मागणी होत असते. तर दुसरीकडे फटाके उडवताना गंभीर दु:खापत होण्याचीही शक्यता असते. मात्र, फटाके उडवण्याची बंदी करण्याची मागणीही काही जणांकडून केली जाते. यावरुनच, आता मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करुन थेट इशाराच दिला आहे.  ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, अशा शब्दात खोपकर यांनी दिवाळी फटाक्यांचा विरोध करणाऱ्या काही मुस्लीमांना थेट शब्दात सुनावले आहे.

दिल्लीत फटाक्यांवर बंदी, तरीही आतषबाजी

दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्ण बंदी घातलेली असली तरी लोकांनी फटक्यांसह धुमधडाक्यात दिवाळी साजरी केल्याचं पाहायला मिळालं. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. रस्त्यावर लोक फटाके फोडताना दिसले. दिवाळीनंतर शुक्रवारी सकाळी संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) हवेची पातळी गंभीर श्रेणीत पोहोचली. दिल्लीच्या जनपथ भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘धोकादायक’ श्रेणीत पोहोचला. आज सकाळी जनपथमध्ये PM 2.5 पातळी 655.07 वर पोहोचली. संपूर्ण दिल्लीचा AQI 446 सह गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबादमध्येही परिस्थिती अत्यंत बिकट होती

दरम्यान, फटाक्यांची दारु उडवताना भडका होऊन अपघातही होत असतात. हैदराबादमध्ये अशाचप्रकारे फटाके उडवताना अपघात होऊन १० जण जखमी झाले असून ४ जण गंभीर आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी, एका लहान मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे.  

टॅग्स :मनसेदिवाळी 2022फटाकेमुस्लीम