जान्हवी मोर्ये, ठाणेदेशात हिंसाचार आणि असहिष्णूता वाढली असून त्याच्या निषेधार्थ लेखकांनी व शास्त्रज्ञांनी एल्गार सुरु केला आहे. सरकार कडून मिळालेले पुरस्कार ते परत करत आहेत. हा मुद्दा गाजत असताना एरवी खूप बोलणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक भालचंद्र नेमाडे आता गप्प का बसले आहेत. त्यांची भूमिका काय आहे याकडे आम्हा साहित्यिकांचे लक्ष लागले आहे, असा थेट सवाल ज्येष्ठ लेखिका गिरीजा कीर यांनी केला आहे.साहित्यिक पुरस्कार परत करीत असल्याचा मुद्दा योग्य की अयोग्य या विषयावर त्यांना विचारले असता त्यांनी लोकमत कडे हा सवाल केला आहे.लेखिका कीर यांनी सांगितले की, लेखकांनी पुरस्कार घेतले. त्यावेळी राज्यात व देशात काँग्रेसचे सरकार होते. लेखक हा लढा हिंसाचाराच्या विरोधात करीत आहेत. असहिष्णूतेच्या विरोधात त्यांचा उठाव आहे. मात्र त्यांच्या प्रतिभेला पुरस्कार मिळाला आहे. त्यांना विरोध करण्यासाठी लेखणी हे त्यांचे अस्त्र आहे. लेखणीची तुलना आपण तलवारीशी करतो. त्यामुळे साहित्यिकांनी लेखणीतून व्यक्त व्हावे असे मला वाटते. निषेध व्यक्त करण्यात प्रत्येक लेखकांमध्ये मतभिन्नता असू शकते. भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वीही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत. कसाबला पोसणे, काश्मीरचा प्रश्न यावर लेखकांनी उठाव केल्याचे ऐकीवात नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय मंडळी एखाद्याची बाजू घेतात. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, असे लेखकांना का वाटत नाही. त्याच्या विरोधात ते कधी का बोलत नाहीत. शेतकरी आत्महत्या करतात. त्यावेळी लेखकांचे रक्त तापून उठत नाही. यातून काय साध्य होणार. मूळात पुरस्कार परत करण्याचा प्रश्न होता का आणि तो परत केल्याने हा प्रश्न सुटणार आहे का याचा सारासार विचार होण्याची गरज आहे. तो मिळालेल्या लेखकांची यादी मोठी आहे. मूळात लेखकांमध्ये एकमत नाही. तो परत करण्याच्या कृतीने लेखकांच्या विचाराला छेद गेला आहे. त्यामुळे मला तरी पुरस्कार परत करण्याची कृती योग्य वाटत नाही, असेही कीर म्हणाल्या.ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे म्हणाले की, लेखकांनी पुरस्कार परत करणे हा देशातील हिंसाचार व असहिष्णू वातावरणाचा निषेध आहे. निषेध कोणी व कशा प्रकारे करावा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .पुस्तक परिक्षण समितीने परिक्षण करु न पुरस्कार दिलेला असतो. तो परत करणे हा त्या समितीचा तसेच वाचकांचाही अवमान आहे. मला पाच पुरस्कार मिळालेले आहे. ते मी परत करून वाचकांचा अनादर करणार नाही.
पुरस्कार परत करण्याच्या मुद्यावर नेमाडे गप्प का?
By admin | Published: November 02, 2015 1:24 AM