डोंबिवली : वाहतूककोंडीच्या साडेसातीतून कल्याणकरांची लवकरच सुटका करून शहरातील वाढत्या अपघातांना रोखले जाईल, असे ठोस आश्वासन भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी जुलै महिन्यात कल्याणकर नागरिकांना दिले होते. शहरातील वाहतूककोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी त्यांनी केडीएमसीत चर्चेनंतर येत्या चार-सहा महिन्यांत शहरातील वाहतुकीचे चांगले चित्र असेल, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र कोंडी सुटलेली नाही. ती कधी सुटणार, असा सवाल वाहनचालकांनी केला आहे. या विशेष बैठकीला परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त संजय जाधव, वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, महापालिकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कल्याण शहरात झालेल्या अपघातांत ३ जणांचा मृत्यू झाला. या वाढलेल्या अपघातांमुळे आणि वाहतूककोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पवार यांनी महापालिका आणि पोलीस यंत्रणेला आवाहन करून ही बैठक घेतली होती. त्या वेळी शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यांवर दुतर्फा बसणारे फेरीवाले, फूटपाथवरील अतिक्रमणे, वाहतूक शिस्त, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही, शहरातील अवजड वाहनांची वाहतूक, ट्रॅफिक पोलीस आणि वॉर्डनची कमतरता, केडीएमसी रस्त्यांची कामे, वाहतूक शिस्तीसाठी नागरिकांचा सहभाग, वाहतूक नियोजनासाठी आवश्यक बदल आणि रखडलेला गोविंदवाडी बायपास आदी विषयांवर निवेदन करून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या होत्या. वाहतूक नियोजनासाठी आवश्यक ठिकाणी शासनस्तरावरून आणि आमदार निधीतून मदत केली जाईल, असे ते म्हणाले होते. त्यांना पोलिसांनी आणि पवारांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले की, केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात असेच त्या बैठकीचे स्वरूप होते का? अशी टीका आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
वाहतूककोंडीतून सुटका कधी?
By admin | Published: November 12, 2015 12:28 AM