Join us  

राज्यसभेवर भाजपकडून कोण?; महाराष्ट्रातील ही नावे आहेत चर्चेत

By यदू जोशी | Published: February 08, 2024 7:38 AM

राणे, रहाटकर, पंकजा, अमरीश पटेल, भंडारी, वाघ यांची नावे आहेत चर्चेत

यदु जोशीमुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात २७  फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळेल ही उत्सुकता असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,  माजी मंत्री पंकजा मुंडे, अमरीश पटेल आदी नावे चर्चेत आहेत. प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली. त्यात काही नावांवर चर्चा करण्यात आली. ही नावे पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पाठवलेल्या नावांचा पक्षश्रेष्ठींनी कितपत विचार केला हे यादी जाहीर झाल्यानंतर समोर येईलच. पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाकडून आलेली नावे जशीच्या तशी स्वीकारली किंवा ऐनवेळी काही नावे बदलली असे दोन्ही अनुभव पूर्वी आलेले आहेत.

या नावांचीही चर्चा  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबईचे संजय उपाध्याय ही नावेदेखील चर्चेत आहेत.  

कुणाला मिळणार संधी? प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे नाव राज्यसभा, विधान परिषदेसाठी दरवेळी चर्चेत असते, मात्र त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. तसेच अलीकडील वर्षांमध्ये पंकजा मुंडे यांचे नावही सातत्याने चर्चेत राहिले असले तरी त्यांनादेखील संधी मिळालेली नाही. नांदेडचे डॉ. अजित गोपचडे यांना मागे विधान परिषदेवर पाठविण्याचे नक्की झाले होते, पण ऐनवेळी  त्यांचे नाव वगळले होते.विभागीय संतुलन, जातींचे संतुलन, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवार देणे, महिलेला संधी आदी निकषांवर भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवेल असे मानले जाते. 

...तर भाजप लढवेल चौथी जागा  सहा जागांपैकी तीन जागा भाजप लढवेल. एक जागा शिवसेनेला तर एक राष्ट्रवादीला दिली जाईल. भाजप चौथी जागा लढण्याची शक्यता जवळपास नाही.मात्र महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर मग आपणही चौथा उमेदवार द्यायचा असे भाजपने ठरविले आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये आला तर भाजप चौथी जागा लढेल असेही मानले जाते. 

तावडेंना पक्ष संघटनेतच ठेवणार की...?  nबिहारचे भाजप प्रभारी असलेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव ऐनवेळी समोर येऊ शकते.nत्यांना पक्ष संघटनेतच ठेवायचे की सोबतच राज्यसभेची संधी द्यायची की लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवायची याबाबत लवकरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

मुरलीधरन यांना पुन्हा संधी मिळणार? nमूळ केरळचे असलेले केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. नारायण राणे तसेच प्रकाश जावडेकर यांच्यासह मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे.nमुरलीधरन यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही तरी त्यांचे मंत्रिपद कायम राहणार आहे. तसेही राज्यसभा निवडणुकी झाल्यानंतर १५ ते २०  दिवसातच लोकसभेची आचारसंहिता लागू होणार आहे.

 

टॅग्स :भाजपानिवडणूकराज्यसभा