Join us  

'सुशांतएवढी चर्चा दूध दराबद्दल, ऊसाबद्दल, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल का नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 4:33 PM

सुशांतच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर राज्यात एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर राजू शेट्टींनी तोफ डागली

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणखी कोणाला आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. मात्र आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे.

मुंबई - सुशांतसिंह राजपूत हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता हा तपास सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत एक चांगला कलाकार होता, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते,' अशी खंत राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या आधी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

सुशांतच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर राज्यात एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर राजू शेट्टींनी तोफ डागली. तसेच, 'राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही . एवढेच काय तर अनेक करोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल का नाही. लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल एवढी चर्चा झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं, असे म्हणत राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणखी कोणाला आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. मात्र आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे. मग असे आंदोलन राजकीय नाही का, असा सवाल उपस्थित करत राजू शेट्टींनी भाजपा नेत्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्षपणे राजकीय असल्याचे म्हटले. दूध उत्पादक प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी देखील डोळेझाक केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचेही ते म्हणाले. 

शरद पवारांनीही चर्चेबद्दल नाराजी व्यक्त केली होती

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होते, पण याची ज्या पद्धतीने चर्चा  होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, परवा मी साताऱ्यात होतो. त्यावेळी एका शेतकऱ्यांने मला याबद्दल विचारले. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटते. त्याने सांगितले  20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याची मीडियात नोंदही नाही. त्यावरुन सर्वसामान्यांची भावना माझ्या लक्षात आली, असे शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :राजू शेट्टीमुंबईसुशांत सिंगआत्महत्या