Join us  

कांद्यावरील निर्यातशुल्क का रद्द करत नाहीत? खरेदी नाफेड करणार ही दिशाभूल; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 3:46 PM

कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई - केंद्र सरकारच्याकांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयावर शेतकरी व व्यापारी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.  शेतकऱ्यांचा वाढता असंतोष लक्षात घेता, देशाचे कृषी मंत्री केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार होते. त्यानुसार आता केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचा २ लाख मेंट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रीया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रीया देत मोदी सरकारवर टीका केली आहे. 

कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संताप पाहून घाबरलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धाव घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगत आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी का करत नाहीत? याचे उत्तर जनतेला द्या, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

कांदा प्रश्नावरुन नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली. नाना पटोले म्हणाले की, मागील वेळीही कांद्याचे दर पडल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात नाफेडने कांदा खरेदी केला नाही तसेच तूर, चणा व कापूसही नाफेडने खरेदी केला नाही. कांदा नाशवंत आहे, तो खराब झाला तर त्याची भरपाई सरकार देणार आहे का? शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

नाफेडच्या माध्यमातून होणार कांदा खरेदी; मिळणार २४१० रुपयांचा भाव

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलनजीवी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान केला हे शेतकरी विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत. शेतकरी पेटून उठला तर भाजपाचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. 

जनता त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल 

"कांद्याच्या दरावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना राज्यातील मंत्री मात्र लोकांच्या भावनांशी खेळत आहेत.  कांदा परवडत नसेल तर महिना-दोन महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं? असा उद्धट सवाल शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना जनतेची, हे सत्तेच्या मस्तीत आहेत पण जनता त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल, असंही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :नाना पटोलेभाजपाकाँग्रेसशेतकरी