Join us  

अनंत-राधिकाच्या लग्नात 'बिन बुलाए मेहमान', पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 10:52 PM

या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न १२ जुलै रोजी झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नाची देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. तसेच, या लग्नाला देशातीलच नाहीतर विदेशातील दिग्गज पाहुण्यांनी हजेरी लावली होती. मात्र, या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी रविवारी माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार,  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दोन जण आमंत्रणाशिवाय दाखल झाले होते. आमंत्रणाशिवाय लग्नकार्यात प्रवेश करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचे नाव व्यंकटेश नरसैया अल्लुरी असे असून हा २६ वर्षांचा यूट्यूबर आहे. तर दुसरा व्यक्ती लुकमान मोहम्मद शफी शेख हा २८ वर्षांचा असून तो स्वत:ला व्यापारी असल्याचे सांगत आहे.

या दोघांनाही मुंबईतील बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या दोघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. हे दोघेही आंध्र प्रदेशातून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मुंबईत आले होते, असे पोलिसांच्या तपासात समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना नोटीस दिल्यानंतर आणि दोघांवरही कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांची सुटका केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेरेमनीपासून या शाही लग्नाची सुरुवात झाली. या लग्न सोहळ्यात देश-विदेशातील सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी उपस्थित होते. तसेच, या लग्नात विदेशातील अनेक कलाकारांनी परफॉर्म केले आहे. 

टॅग्स :अनंत अंबानीमुकेश अंबानीमुंबई