Join us  

'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे १०० जन्म तुम्हाला कळणार नाही'; संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 11:14 AM

Sanjay Raut, Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.

Sanjay Raut, Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. महायुतीमधील नेत्यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये  मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार या चर्चा सुरू आहेत, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांच्या डोक्यात तीन, चार नावे आहेत. पण उद्धव ठाकरे यांचे नाव नाही'. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दरम्यान, यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. 

"मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत", प्रसाद लाड यांची टीका

दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रि‍पदाबाबत म्हणाले, 'शरद पवार यांच्या डोक्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे नाही, हे फडणवीस यांनी सांगितले. परंतु इतर तीन, चार जण आहेत. ते कोण आहेत, हे आपण सांगणार नाही. परंतु उद्धव ठाकरे नाहीत, हे नक्की आहे',  यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललं आहे, हे फडणवीस यांना कळालं असतं तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. कोणाचं नाव आहे, कोणाचं नाही. २०१९ साली सुद्धा पवार साहेबांच्या डोक्यात काय होतं हे पवारांना कळलं नव्हतं. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. २०२४ ला वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे, हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद होईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

"अमित शाह यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक उद्योग गुजरातला दिले. यामुळे अमित शाह यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मुंबई लुटणे, लुटणाऱ्यांना पाठिंबा देणे, पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे हे यांचं स्वप्न आहे, यासाठी ते महाराष्ट्रात सारखे येतात. मला शाह लालबागचा राजा गुजरातला घेऊन जातील याची भिती वाटत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी शाह यांच्यावर लगावला.

'केंद्रीय मंत्र्यांनी मणिपूरला गेले पाहिजे'

"मणिपूरमध्ये आजही गोंधळ सुरू झाला आहे, केंद्रीय मंत्र्यांनी मणिपूरमध्ये जाण्याची हिंमत दाखवली पाहिजे, असंही राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना