गोंडेगाव येथील घटना : शेतातच घेतले विषारी औषधकन्हान : कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या एका तरुण शेतकऱ्याने कुठले तरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना कन्हान नजीकच्या गोंडेगाव येथे रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुभाष पांडुरंग पाटील (३६, रा. गोंडेगाव, हल्ली मु. कन्हान) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष पाटील यांची गोंडेगाव शिवारात २.३ एकर शेती आहे. शेती कसण्याकरिता त्यांनी बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने तो सतत चिंतित होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. कर्जबाजारीपणामुळे तो सतत हताश होता. दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास तो आपल्या शेतात गेला होता. शेतातच सुभाषने कुठले तरी विषारी कीटकनाशक प्राशन केले. दरम्यान, ही बाब लगतच्या शेतकऱ्यांना ध्यानात येताच नागरिकांनी त्यास कामठी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. तेथे उपचारादरम्यान सुभाषचा दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी कामठी पोलिसांनी मृत शेतकऱ्याचा भाऊ नितीन पांडुरंग पाटील (३०, रा. गोंडेगाव) यांच्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)
कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: November 02, 2015 2:11 AM