राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची
By admin | Published: November 2, 2015 02:14 AM2015-11-02T02:14:00+5:302015-11-02T02:14:00+5:30
धर्मसत्तेमध्ये नैतिकता पाळली जाते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची असते. देशातील सज्जन शक्तींनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस : मंगलनाथ महाराजांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा
नागपूर : धर्मसत्तेमध्ये नैतिकता पाळली जाते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची असते. देशातील सज्जन शक्तींनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. मंगलनाथ महाराज यापैकीच एक आहेत. त्यांचा भक्तसंप्रदाय मोठा आहे. त्यांना शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभला आहे. ते शतायुषी होऊन समाजाला मार्गदर्शन करीत राहतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.
नाथ संप्रदायातील चित्रकूट गादीचे अधिपती सद्गुरुयोगेश्वरानंद डॉ. मंगलनाथ महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. रोडी परिवारातर्फे लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीबाई सभागृह परिसरात आयोजित या सोहळ्याला रविवारपासून सुरुवात झाली.
याप्रसंगी फडणवीस यांच्या हस्ते मंगलनाथ महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी महाराज, आचार्य गोविंददेव गिरी महाराज, लोणी येथील सखाराम महाराज संस्थानचे प्रमुख नाना महाराज, कांचन गडकरी व अंकुर सिडस्चे अध्यक्ष रवी काशिकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अतिशय मानाची अपेक्षा, सतत वाद घालणे, रागावणे, परिग्रह करणे, आत्मप्रशंसा व मित्रद्रोह या सहा गोष्टी मनुष्याचे आयुष्य कुडतडून टाकतात. यामुळे आपण शतायुषी असूनही पूर्ण आयुष्य उपभोगू शकत नाही, असे मार्गदर्शन शंकराचार्यांनी केले. वीणा पेंडके यांनी मानपत्राचे वाचन, रेणुका देशकर यांनी संचालन तर, दिलीप रोडी यांनी आभार व्यक्त केले.(प्रतिनिधी)
धार्मिकतेवरून देशात गैरसमज - गडकरी
भारतीय जीवनमूल्ये, विचार व हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे. परंतु, गेल्या काही काळापासून धार्मिकता व जातीवादावरून समाजामध्ये गैरसमज पसरविण्यात येत आहे. यातून संघर्ष निर्माण होत आहे. त्याचा राजकीय उपयोग केला जातोय, अशी खंत नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. साधूसंतांच्या संस्कारामुळे हिंदू संस्कृतीने जगात वेगळा ठसा उमटविला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे प्रगती होते पण, जीवन घडविण्याचे काम संस्कृती करीत असते. असे असले तरी आपल्याला स्वत:च्या देशात यावरून टीका सहन करावी लागत आहे. समाजाला भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. आज सोशल मीडियाचा वापर करून भारतीय जीवनमूल्ये रुजविण्याची गरज आहे. मंगलनाथ महाराज यांनी धार्मिक, व्यसनमुक्ती, प्रबोधन इत्यादी क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांनी अनेक शिष्यांना दृष्टी दिली आहे. योग्य दृष्टी असल्याशिवाय समाजात परिवर्तन होऊ शकत नाही असेही गडकरी यांनी सांगितले.