गोकुळ सोनवणे सातपूरसातपूर गावठाण आणि आजूबाजूच्या झोपडपट्ट्या असलेल्या या परिसराचे नेतृत्व गेल्या २५ वर्षांत काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकपा, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांनी केलेले आहे. त्यात स्वारबाबानगरात रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी तब्बल २० वर्षे प्रभागात स्थान निर्माण केले. गावठाण आणि झोपडपट्ट्यांना सोयी, सुविधा मिळाल्यात परंतु अपेक्षित विकास मात्र होऊ शकला नाही. सातपूर गावातील भाजी विक्रेत्यांचे अतिक्र मण आणि श्री छत्रपती शिवाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्या गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेल्या २० वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला टाउन हॉल अजूनही अक्षरश: धूळ खात पडून आहे.महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण घोषित करण्यात आले आहे. त्यात पूर्वीचा प्रभाग क्र मांक २० संपूर्ण आणि प्रभाग क्रमांक ५० मधील सातपूर गाव, महादेववाडी, तर प्रभाग क्रमांक १९ मधील सातपूर कॉलनी, एमआयडीसी कॉलनी जोडून प्रभाग क्रमांक ११ ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभागात प्रबुद्धनगर, जगतापवाडी, महादेवनगर,संतोषीमातानगर, कांबळेवाडी या झोपडपट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. आरक्षणाचा विचार केल्यास प्रभागातील चारही जागांवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील दोन जागांवर अनुसूचित जाती महिला, व सर्वसाधारण महिला, तर अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या दोन जागांपैकी ओबीसीच्या एका जागेवर उड्या पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यात सर्वसमावेशक उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. या प्रभागात समस्यादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. अंतर्गत राजकारणामुळे विकास खुंटल्याची भावना व्यक्त होत आहे. एमआयडीसी याच भागात येत असल्याने तेथील पथदीप, घंटागाडी, रस्ते, साइडपट्ट्या आदि समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. एमआयडीसीत अद्याप भुयारी गटार योजना अंमलात आणलेली नाही, अशी उद्योजकांची ओरड आहे. मनपा विभागीय कार्यालयाशेजारीच २० वर्षांपूर्वी टाउन हॉल उभारण्यात आला असून, अजूनही त्याचे लोकार्पण झालेले नाही. सातपूर गावातील मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्या २५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हा विषय अद्याप सुटलेला नाही. स्मार्ट सिटीकडे आगेकूच होत असताना गावठाण आणि झोपडपट्ट्यांना बकालपणा अजूनही कायम आहे.
.महापालिकेच्या निवडणुकीत ज्या- ज्यावेळी प्रभागरचना आणि आरक्षण घोषित झाले तसे या भागाचे कधी विभाजन तर कधी जोडणी झाल्याने मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींना संधी मिळालेली आहे. ११९२ साली झालेल्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे रामचंद्र निगळ, दिलीप निगळ आणि माकपाच्या अॅड. वसुधा कराड यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. १९९७ सालीदेखील काँग्रेसच्या मंगला निगळ, रिपाइंचे प्रकाश लोंढे, भाजपाच्या कमल विधाते यांनी प्रतिनिधित्व केले आहे. २००२ च्या त्रिसदस्यीय निवडणुकीत माकपाच्या अॅड. वसुधा कराड, रिपाइंचे प्रकाश लोंढे आणि शिवसेनेचे सुरेश भंदुरे यांना मतदारांनी पसंती दिली होती. २००७ च्या निवडणुकीत अपक्ष सुवर्णा मोराडे, तसेच रिपाइंचे प्रकाश लोंढे, बसपाच्या सुजाता काळे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २००२ च्या द्विसदस्यीय प्रभागरचनेत या परिसराचे विभाजन झाल्याने रिपाइंचे प्रकाश लोंढे आणि मनसे लाटेत सविता काळे निवडून आल्या. म्हणजेच गेल्या २० वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांना नव्याने झालेल्या प्रभागरचनेचा आणि आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे.