लाभार्थीकडून रक्कम वसूल करा
By Admin | Published: November 12, 2016 12:00 AM2016-11-12T00:00:38+5:302016-11-12T00:10:03+5:30
तक्रार निवारण मंचचा आदेश : जुन्या विहिरीवर घेतला नवीन विहिरीचा लाभ
येवला : पंचायत समितीच्या शासकीय अधिकाऱ्याच्या संगनमताने खोटी कागदपत्रे बनवून उताऱ्याच्या नोंदीत फेरफार करत हवे तसे उतारे बनवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाची फसवणूक करत जुन्या विहिरीवरच नवीन विहीर असल्याचे दाखवून लाभ घेतला. या प्रकरणी नाशिक जिल्हा तक्रार निवारणचे प्राधिकारी मनोहर बच्छाव यांनी संबंधित लाभार्थीकडून दोन लाख ७८ हजार १९४ रुपयाची रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधित विस्तार अधिकाऱ्याचा मनरेगाचा पदभार काढण्यासह जबाबदार शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पंचायत समिती वर्तुळात खळबळ उडाली
आहे.
देवळाणे येथील बाळनाथ भीमा गोसावी या शेतकऱ्याने जुनी विहीर नवीन असल्याचे दाखवून संगनमताने लाभ उचलल्याप्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितावर
कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जालिंदर गोसावी यांनी तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांकडे केली होती.
या प्रकरणी तक्रार निवारण प्राधिकारी यांनी दिलेल्या निर्णयात लाभार्थी बाळनाथ गोसावी यांच्याकडून दोन लाख ७८ हजार १९४ रु पये वसूल करावेत. तसेच ग्रामरोजगार सेवक कांतिलाल जाधव, तलाठी, तत्कालीन ग्रामसेवक विनोद बनसोडे, हल्ली कार्यरत असलेले ग्रामसेवक संदीप कत्तूरवार, तांत्रिक अधिकारी पंकज नगराळे, विस्तार अधिकारी आनंद यादव यांच्यावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश तक्र ार निवारण प्राधिकारी यांनी दिले आहेत. याशिवाय विस्तार अधिकारी यादव यांच्याकडील कारभार तत्काळ काढून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवाय तत्कालीन गटविकास अधिकारी जोशी यांना सक्त ताकीद देऊन सध्याचे गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी मनरेगाच्या तक्रारी निकाली काढताना वस्तुस्थितीची शहानिशा करण्याची दक्षता घ्यावी, असा लेखी आदेश दिला. या प्रकरणाच्या निकालामुळे येवला पंचायत समितीत आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो असे म्हणण्याची वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)