मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी, आता दिल्लीकडे आगेकूच करुन दिल्ली जिंकायचं स्वप्नही त्यांनी बोलून दाखवलं. तसेच, वेळ आल्यास तलवार फिरवने, असे म्हणत विरोधी पक्ष भाजपलाही टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने सामने आले आहेत. त्यातच, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेनेनं एकत्र येण्याचं आवाहन केलंय.
वेगवेगळ्या लाटा येतात. सध्या कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत तर मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही? २५ वर्षे युतीत सडल्यानंतर आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नाही. भाजपचे हिंदुत्व पोकळ आहे. त्यांची एका राज्यात एक भूमिका तर दुसऱ्या राज्यात वेगळी भूमिका असते, असा घणाघाण उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला होता. त्यानंतर, आता रामदास आठवलेंनी भाजपचे समर्थन केले आहे. तसेच, भाजपाने हिंदुत्वाला सोडलं नसल्याचंही ते म्हणाले.
भाजपने हिंदुत्वासोबतच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.. अशी भूमिका बजावली आहे. भाजपने हिंदुत्व सोडले नाही, याउलट मला वाटते शिवसेनेनंच हिदुत्व सोडले आहे. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याबाबतचा विचार केला पाहिजे, असेही रामदास आठवलेंनी म्हटले. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मन मोठे करून शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन सत्तेत सहभागी व्हावे व पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असेही आठवलेंनी यापूर्वी म्हटले होते.