ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ११ - देशभरात बीफवरुन वाद सुरु असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक पी एम भार्गव यांनी आयूर्वेदातही बीफला महत्त्व असल्याचा दावा केला आहे. बीफ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो असे भार्गव यांचे म्हणणे असून पुरातन ग्रंथांमध्येही बीफवर बंदी असल्याचा उल्लेख दिसत नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे संस्थापक पी एम भार्गव यांनी चरक संहितेचा दाखला देत बीफचे महत्त्व सांगितले आहे. जास्त शारीरिक श्रम करणारे व बदलत्या मौसमामुळे वारंवार आजारी पडणा-यांसाठी बीफ उपयुक्त असते. कोरडा खोकला, अनियमित ताप आणि थकव्याने ग्रासलेल्यांसाठी बीफ फायदेशीर आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकार हे विज्ञान क्षेत्राविषयी सर्वात कमी माहिती असलेले सरकार आहे. या सरकारला विज्ञानाविषयी फारशी रुचीही नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात भार्गव यांनी काही दिवसांपूर्वी पद्मभूषण पुरस्कार परत केला होता.