अमृतसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षीही भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अमृतसरमधील खासा येथील डोगराई युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. भारतीय फौजांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी या ठिकाणी युद्ध जिंकले होते. हे अत्यंत कठीण रणांगण मानले जाते. तसेच अमृतसर-खेमकरन मार्गावरील वालतोहा नजीकच्या असल उत्तर स्मारकालाही भेट देऊन परमवीरचक्र क्वॉर्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.शौर्य आणि चारित्र्यामुळे अवघे जग भारताकडे अत्यंत आदराने पाहते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. माजी सैनिकांचे वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन चालू असताना पंतप्रधानांनी हे विधान केले. मागच्या वर्षी त्यांनी सियाचीनमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.१९६५ मध्ये असल उत्तर लढाईत अब्दुल हमीद यांनी गंभीर जखमी असतानाही एकट्यानेच शत्रूंचे तीन रणगाडे उद्ध्वस्त करून आक्रमण रोखण्यात मोठी मदत केली, असा उल्लेखही पंतप्रधानांनी यावेळी केला. नंतर टिष्ट्वटवर त्यांनी म्हटले की, अब्दुल हमीद यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करतो. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले. खासा येथे जवानांपुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो असून ही संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. शौर्य, त्याग आणि स्वप्नामुळे जग भारताकडे आदराने पाहते. हे केवळ गणवेशामुळेच नव्हे, तर सशस्त्र दलाच्या चारित्र्यामुळे होय. सशस्त्र दलातील नेत्यांनी सशस्त्र दलाचे संगोपन केल्यामुळे भारताची मान गौरवाने उंच राहते.
पंतप्रधानांची जवानांसोबत दिवाळी साजरी
By admin | Published: November 12, 2015 12:06 AM