दिव्यांगांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविताना अनेकदा शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते, मात्र याबाबतीत राजस्थानची राजधानी जयपूरमधून हृदयस्पर्शी चित्र समोर आले.
जयपूरचे जिल्हाधिकारी आयएएस प्रकाश राजपुरोहित यांनी एका दिव्यांगाला आपल्या टेबलावर बसवून त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
जयपूर येथे जनसुनावणी होती. किशनगड रेनवाल येथील दिव्यांग ओमप्रकाश हे देखील आले होते. त्यांना दोन्ही पायांवर उभे राहता येत नाही. ते हातावर रेंगाळत जमिनीवर सरकत चालतात. ते जनसुनावणीवेळी पुढे पुढे येत होते. जिल्हाधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी लगेच तक्रार ऐकून घेण्यासाठी कुमावत यांना आपल्याच टेबलावरती बसवले.
ओमप्रकाशचा भाऊही असाच दिव्यांग आहे. आपल्या घरासमोरील रस्ता उंच असल्याची तक्रार घेऊन ते आले होते. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरते आणि दोन्ही भावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.