ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - बिहारमधल्या पराभवाचं खापर केवळ नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर फोडणं अन्यायाचं ठरेल असं सांगताना भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षेतखालीदेखील निवडणुका हरल्याची आठवण करून दिली. आडवाणी, शांताकुमार, मुरली मनोहर जोशी आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारच्या पराभवासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत मोदी - शाह जोडीवर शरसंधान केले होते. परंतु गडकरी यांनी मोदींची पाठराखण करत भाजपातल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात काहीही तथ्य नसल्याचेच सूचित केले आहे.
आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तो काही एखाद्या कुटुंबाचा पक्ष नाही, त्यामुळे जय पराजय ही सामूहिक जबाबदारी असल्याची भूमिका गडकरींनी मांडली आहे. तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी बेरजेचे राजकारण करत भाजपाचा पराभव केल्याचा दावा गडकरी यांनी केला आहे. भाजपाने अनेक जय व पराजय बघितले असून बिहारच्या संदर्भात पक्षाला पाच ते सात टक्क्यांनी जनाधार वाढवण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
वादग्रस्त वक्तव्ये करणा-यांविरोधात कडक कारवाई करावी अशी सूचना आपण अध्यक्ष अमित शाह यांना केली असल्याचेही गडकरींनी सांगितले.