नवी दिल्ली : आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘मालिकावीरा’चा पुरस्कार जिंकून चाहत्यांची वाहवा मिळविली आहे. मैदानाबाहेर मात्र त्याच्या कामगिरीवर ‘ ट्विटर वॉर’ सुरू झाले. या वॉरचा सूत्रधार आहे अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग!
‘टर्ब्युनेटर’ नावाने ख्यातिप्राप्त असलेला हरभजन आश्विनच्या चमत्कारिक फिरकीमुळे फारच चिंताग्रस्त दिसतो. न्यूझीलंडच्या फलंदाजांचे अपयश समजण्यासारखे आहे; पण ज्युनियर आश्विनच्या यशामुळे भज्जीच्या पोटात गोळा का यावा, हे समजण्यापलीकडचे आहे. इंदूरच्या खेळपट्टीवर आश्विनची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर हावी होत असताना भज्जीचा द्वेष वाढतच चालला होता. आश्विनच्या कामगिरीवर तो इतका नाराज झाला, की त्याने ट्विटट करून भारतीय गोलंदाजांच्या कौशल्यापेक्षा संघाच्या विजयात विकेटचे योगदान मोठे असल्याचे सांगून टाकले.
आश्विन-भज्जी यांच्यात चढाओढ! देशातील दोन्ही दिग्गज आॅफ स्पिनर आहेत. भज्जीची ३९ कसोटींतील कामगिरी १७२ बळी आहे. त्यात १४ वेळा त्याने ५ वा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले. १० गडी बाद करण्यात त्याला यश आले नव्हते. त्याचा स्ट्राइक रेट ६२.३ असा आहे. इतक्याच सामन्यांत आश्विनने २२० गडी बाद केले आहेत. या ३९ सामन्यांत आश्विनने २१ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. १० गडी बाद करण्याची किमयादेखील त्याने ६ वेळा साधली आहे. त्याचा स्ट्राइक रेटदेखील भज्जीच्या तुलनेत कमी, अर्थात ४९.४ असाच आहे. हरभजनने भारतीय खेळपट्ट्यांवर ५५ कसोटी सामन्यांत १०३ डावांत २६५ गडी बाद केले. या काळात त्याने १८ वेळा पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले. चार वेळा त्याला १० गडी बाद करण्यात यश आले आहे. या ५५ सामन्यांत भज्जीचा स्ट्राइक रेट ५४.१ असा होता. आश्विनने घरच्या मैदाानवरील २२ सामन्यांत १५३ गडी बाद केले. आश्विनने १६ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक फलंदाज टिपले. १० गडी बाद करण्याची किमयादेखील त्याने ५ वेळा साधली आहे.