हरारे : दुसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव करणारा पाहुणा भारतीय संघ आज बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.भारताने वन-डे मालिकेत झिम्बाब्वेला ३-० ने ‘क्लीन स्वीप’ केले होते; पण शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पाहुण्या संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन करताना हरारे स्पोर्ट्स क्लबवर एकतर्फी विजय नोंदविला. भारतीय संघ आणखी एका सहज विजयाची नोंद करीत मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यास उत्सुक आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघातील बरिंदर सरन, मनदीप सिंग, लोकेश राहुल आणि जसप्रीत बुमराह यांनी सोमवारी प्रभावी कामगिरी केली. युवा वेगवान गोलंदाज सरनने पदार्पणाच्या लढतीत भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी केली. मनदीपने अर्धशतकी खेळी केली, तर राहुलने शानदार फलंदाजी करताना संघाला सहज विजय मिळवून दिला. सरनने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले, तर बुमराहने त्याला योग्य साथ देताना ३ फलंदाजांना माघारी परतवले. मनदीपने टी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच अर्धशतक झळकाविले. हे युवा खेळाडू पुन्हा एकदा कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहेत. (वृत्तसंस्था)भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच १० गडी राखून विजय मिळविला आहे. या विजयामुळे पाहुण्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावण्यास मदत झाली असेल. गेल्या लढतीत मोठा विजय मिळविला असला, तरी अनुभवी धोनी झिम्बाब्वेला कमी लेखण्याची चूक करणार नाही. धोनीने संघ सहकाऱ्यांना आत्ममश्गूल न राहण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी विजयानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये वेगाने धाव पळण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांवर दडपण येते.’झिम्बाब्वेबाबत विचार करता ग्रीमी क्रेमरच्या नेतृत्वाखालील संघ मालिकेचा सकारात्मक शेवट करण्यास प्रयत्नशील आहे. नियमित अंतरात विकेट गमाविल्याचा संघाला फटका बसला असल्याची कबुली क्रेमरने सोमवारी लढतीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली होती. झिम्बाब्वे संघाची भिस्त चामू चिभाभा, हॅमिल्टन मसाकाद््जा, सिकंदर रजा, एल्टन चिगुम्बुरा आणि माल्कम वॉलेर यांच्या फलंदाजीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजांकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. प्रतिस्पर्धी संघभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), लोकेश राहुल, फैज फजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि युजवेंद्र चहल.झिम्बाब्वे : ग्रीम क्रेमर (कर्णधार), वुसीमुजी सिबांडा, सिकंदर रजा, एल्टन चिगुम्बुरा, हॅमिल्टन मसाकाद्जा, वेलिंग्टन मसाकाद्जा, तेंडाई चतारा, चामू चिभाभा, डोनाल्ड तिरिपानो, मॅल्कम वॉलेर, पीटर मूर, तापिवा मुफुद्जा, टिनोटेंडा मुतोम्बोद्जी, रिचमंड मुतुम्बामी, तौराई मुजारबानी, ब्रायन चारी, नेविल मादजिवा, तिमीसेन मारुमा.
भारताचे पारडे वरचढ
By admin | Published: June 22, 2016 3:30 AM