नवी दिल्ली : पहिल्या डावात घेतलेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या ‘अ’ गटात बडोद्याविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्यात ३ गुणांची कमाई केली. यासह मुंबईने ९ गुणांसह गटात अग्रस्थान पटकावले आहे. दिल्ली येथील मॉडेल क्रीडा संकुलात झालेल्य या सामन्यात बडोद्याने पहिल्या डावात ३०५ धावांची मजल मारल्यानंतर दुसरा डाव ३८३ धावांवर घोषित करुन मुंबईला विजयासाठी ३६६ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकरांनी चौथ्या दिवसअखेर ७७ षटकात ५ बाद २२४ धावांची मजल मारली. मुंबईने पहिल्या डावात ३२३ धावा काढून १८ धावांची माफक परंतु निर्णायक आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवसअखेर बडोद्याने ५ बाद ३२१ धावांची मजल मारली होती. दीपक हूडाने चौथ्या व अंतिम दिवशी वैयक्तिक ६६ धावांवरुन खेळताना १०३ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद १०० धावा काढल्या. हूडाच्या शतकानंतर कर्णधार इरफान पठाणने लगेच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.३६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने अंतिम दिवशी ७७ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २२४ धावांची मजल मारली. कर्णधार आदित्य तरेने सर्वाधिक नाबाद ६३ धावांची खेळी करत १६२ चेंडूत ९ चौकार मारले. पहिल्या डावातील शतकवीर अखिल हेरवाडकर यावेळी २० धावा काढून परतला. परंतु, त्याने जय बिस्तासह (४९) अर्धशतकी सलामी देत मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली होती.श्रेयश अय्यर ५४ धावांत ४६ धावा काढून परतला. बडोद्याकडून युसुफ पठाण व मुर्तुझ वहोरा यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईकर अखिल हेरवाडकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक :बडोदा (पहिला डाव) : ८६.१ षटकात सर्वबाद ३०५ धावा.मुंबई (पहिला डाव) : ९२.५ षटकात सर्वबाद ३२३ धावा.बडोदा (दुसरा डाव) : ९४ षटकात ५ बाद ३८३ धावा (घोषित) (केदार देवधर १४५, दीपक हूडा नाबाद १००, आदित्य वाघमोडे ६६; तुषार देशपांडे २/६१)मुंबई (दुसरा डाव) : ७७ षटकात ७ बाद २२४ धावा (आदित्य तरे नाबाद ६३, जय बिस्ता ४९, श्रेयश अय्यर ४६; मुर्तुझा वहोरा २/३२, युसुफ पठाण २/५९)
मुंबई वि. बडोदा लढत अनिर्णित
By admin | Published: October 17, 2016 3:43 AM