धर्मशाला : आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार असल्याचे संकेत मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने दिले आहेत.अलीकडेच आटोपलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने क्लीन स्वीप केले. आक्रमक धोरणामुळेच आम्ही यशस्वी ठरलो, असे रहाणेला वाटते. एचपीसीए स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना रहाणे म्हणाला, ‘माझ्या मते शिस्तबद्ध खेळ महत्त्वाचा आहे. कसोटीत आम्ही आक्रमक धोरणाचा अवलंब केला. आता पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारण्याची वेळ आली आहे. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने आणि कच्चे दुवे शोधण्याच्या भानगडीत न पडता आपली क्षमता ओळखण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला लय मिळविणे हे पाच सामन्यांच्या मालिकेत संघापुढील पहिले ध्येय असेल.’मालिकेतील पहिला सामना उद्या, रविवारी धर्मशाला येथे खेळला जाईल. फलंदाज या नात्याने कमी वेळेत कसोटी ते वन-डे अशा प्रकारात स्वत:ला फिट बसविणे किती कठीण असते, असा सवाल करताच अजिंक्य म्हणाला, ‘माझ्या मते हे फलंदाजांच्या मानसिकतेवर विसंबून असते. व्यावसायिक खेळाडू या नात्याने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असावेच लागते. मानसिकरीत्या सकारात्मक राहून परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे आव्हान असते. आम्ही अनुभवी खेळाडू असल्याने कसोटी ते वन-डे या प्रवासात कसा खेळ करावा, हे सांगण्याची गरज नाही.’भारताला या मोसमात व्यस्त क्रिकेट खेळायचे असल्याने सध्याच्या वन-डे मालिकेतून रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी जयंत यादव, अक्षर पटेल, मनदीपसिंग, धवल कुलकर्णी, मनीष पांडे यांना स्थान देण्यात आले. नव्या चेहऱ्यांना संधी देणे हा चांगला प्रयोग असल्याचे सांगून रहाणे म्हणाला, नव्या सहकाऱ्यांच्या खेळाबद्दल मला देखील उत्सुकता आहे. यापैकी काहींनी रणजी करंडकात चमकदार कामगिरी केली. आता राष्ट्रीय संघात खेळून या सहकाऱ्यांनी स्वत:चा आत्मविश्वास उंचवावा, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)
वन-डेतही आक्रमक खेळी कायम राहील
By admin | Published: October 15, 2016 1:32 AM