ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. १० - टी20 वर्ल्ड कपचे पात्रता फेरी सामने बुधवारपासून सुरु झाले आहेत. मात्र पाकिस्तान क्रिकेट संघ अजूनही पाकिस्तान सरकारच्या निर्णयाची वाट पाहत पाकिस्तानातच थांबला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर भारत - पाकिस्तान सामना धरमशालाऐवजी कोलकाता येथे घेण्याचा निर्णय झाला असतानादेखील अजूनही पाकिस्तान सरकार सुरक्षेच्या बाबतीत साशंक आहे.
भारत सरकार पाकिस्तानी खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेची लेखी हमी देत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान संघ पाठवणार नाही असं पाकिस्तान सरकारने सांगितलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतात जाण्यास परवानगी दिली होता मात्र अंतिम निर्णय अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान घेतील असं सांगितलं होतं.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला पाकिस्तान गृहमंत्रालयाने फोन करुन सुरक्षेची पुर्ण तरतदू करत लेखी हमी देण्यास सांगितलं आहे. वेळापत्रकाप्रमाणे पाकिस्तान संघ बुधवारी संध्याकाळी भारतासाठी रवाना होणार होता. पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ सध्या लाहोरमध्ये आहे तर महिला क्रिकेट संघ कराचीमध्ये आहे. दोन्ही संघ भारताकडे रवाना होण्यासाठी पाकिस्तान सरकार हिरवा कंदील दाखवण्याची वाट पाहत आहेत.