जलयुक्त शिवारच्या कामांमुळे या वर्षी टँकर झाले कमी
By admin | Published: May 11, 2017 04:20 AM2017-05-11T04:20:07+5:302017-05-11T04:20:07+5:30
दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन उन्हाळ्यात टँकरची संख्या घटली आहे. गेल्या उन्हाळ्यात तालुक्यात २८ टँकर सुरू होते. त्यातुलनेत उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात ३ टँकर सुरू असून ४ गावांसाठी ४ टँकरचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी साधारणत: ७ टँकर वाढतील, अशी स्थिती आहे. परिणामी, १८ टँकरची संख्या घटलेली आहे.
पडवी, खोर, कुसेगाव या परिसरात सातत्याने टँकर सुरू असायचे; मात्र सध्याच्या परिस्थितीत या गावांना टँकरने पाणीपुरवठा नाही. खडकवासला कॅनॉलवरून ३३ गावांना पाणीपुरवठा होतो, तर भीमा नदीकाठावरच्या ९ गावांना पाणीपुरवठा नदीपात्रातून होतो. त्यामुळे नदीपात्र आणि खडकवासला कॅनॉलला पाणी असल्यामुळे पाणीटंचाई भासत नाही. जिरायत पट्ट्यात काही भागात जलयुक्त शिवाराची कामे होऊनदेखील टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत काही तलाव, ओढे, कोरडे ठणठणीत आहेत. कौठडी, ताम्हाणवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वासुंदे, हिंगणीगाडा, स्वामी चिंचोली या ठिकाणी टँकरची मागणी वाढली आहे. तर, अन्य काही गावांसह वाड्यावस्त्यांवर टँकरची गरज भासेल, असे एकंदरीत चित्र आहे.
तेव्हा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नालाखोदाई, तलाव साफसफाई, चाऱ्या खोदणे इत्यादी कामे झाली असली, तरी ही योजना निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस पडला, तरच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी आडवा मोहीम यशस्वी होऊ शकते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांगली कामे झाली, हे नाकारून चालणार नाही. परिणामी, या योजनेअंतर्गत वाढलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग काही जिरायत भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी झालेला आहे. २०१५-१६ वर्षांत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला, बंधारा खोदाई, नाला साफसफाई, गाळ काढणे इत्यादी कामे झाली आहेत. ही कामे विशेषत: रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, कुसेगाव, कौठडी, खडकी, नंदादेवी, पांढरेवाडी, स्वामी चिंचोली, जिरेगाव, देऊळगावगाडा, वाखारी, खोर, पडवी, यवत, डाळिंब, ताम्हाणवाडी, दापोडी या गावात झालेली आहेत.
पावसाचे पाणी बऱ्यापैकी साठवले गेले होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमिनीत मुरल्याने काही जिरायती गावांत पाण्याची टंचाई आहे. येणारा पावसाळा जोरदार झाल्यास जमिनीत पाणी मुरण्याचा प्रकार राहणार नाही. परिणामी ओढे, नाले, तलाव
यांत पाण्याचा साठा बऱ्यापैकी राहील. त्यानुसार पाणीटंचाईवर मात करता येईल.